क्रिकेटमध्ये पेनल्टी म्हणून एखाद्या संघाला धावा बहाल करण्याचा नियम आहे. पण या नियमाबद्दल अनेकांना महिती नाही. फलंदाजी करणाऱ्या संघाला ५ धावा पेनल्टी म्हणून तेव्हा दिल्या जातात, जेव्हा एखाद्या खेळाडूचे हेल्मेट मैदानावर ठेवलेले असते आणि त्याला फलंदाजाने मारलेला चेंडू लागतो.
तसेच जर एखाद्या क्षेत्ररक्षकाने त्याच्या टोपीने किंवा कपड्यांच्या सहाय्याने चेंडू आडवण्याचा प्रयत्न केला तरी ५ धावा फलंदाजी करणाऱ्या संघाला दिल्या जातात. किंवा पंचांच्या परवानगी शिवाय मैदानात क्षेत्ररक्षण करण्यासाठी आलेल्या खेळाडूने जर चेंडूला हात लावला तरी फलंदाजी करणाऱ्या संघाला ५ धावा दिल्या जातात.
दुसरीकडे जर फलंदाज जाणूनबुजून शॉर्ट रन (क्रिजमध्ये बॅट न टेकवता घेतलेली धाव) घेतली, किंवा फलंदाजांना चेतावणी मिळूनही त्यांनी खेळपट्टी खराब करण्याचा प्रयत्न केला तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघात पेनल्टी धावा दिल्या जातात. तसेच जो संघ चेंडूशी छेडछाड करेल त्याच्या प्रतिस्पर्धी संघालाही ५ पेनल्टी धावा दिल्या जातात.
अशा पेनल्टी धावा मिळालेल्या या ५ घटना –
ऑस्ट्रेलियाला सिडनीमध्ये खेळपट्टीवर धावण्यासाठी झाला ५ धावांचा झाला दंड –
जानेवारी २०२० ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात सिडनी येथे तिसरा कसोटी सामना झाला होता. या सामन्यात चौथ्या दिवशी मैदानातील पंच अलीम दार यांनी न्यूझीलंड संघाला ५ धावा दिल्या होत्या. ही घटना ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ५० व्या षटकात घडली.
अलीम दार यांनी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅब्यूशानेला खेळपट्टीच्या मधून धावण्याबद्दल आधीच ताकिद दिली होती. पण त्यानंतर काहीवेळाने डेव्हिड वॉर्नरने मॅट हेन्रीच्या चेंडूवर फटका मारत खेळपट्टीच्या मधून धावून १ धाव घेतली. त्यावेळी अलीम दार यांनी त्याला ही धाव ग्राह्य धरली जाणार नसल्याचे सांगत न्यूझीलंडला ५ धावा दिल्या.
त्यामुळे न्यूझीलंडसमोरील दुसऱ्या डावात विजयसाठी असलेले ४२१ धावांचे आव्हान ५ धावांनी कमी करुन ४१६ करण्यात आले. अलीम दार यांच्या या निर्णयामुळे वॉर्नर चिडला होता.
२. इंदोर कसोटीत भारताला खेळपट्टीवर धावल्याबद्दल झाला ५ धावांचा दंड –
ऑक्टोबर २०१६ ला भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडला ५ धावा मिळाल्या होत्या. ही घडना सामन्याच्या तिसऱ्या दिवशी झाली होती. त्या दिवशी फलंदाजी करत असताना अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाला २ वेळा खेळपट्टीवर धावल्यामुळे ताकिद दिली होती.
पण भारताच्या पहिल्या डावात ट्रेंड बोल्टच्या चेंडूवर जडेजाने खेळपट्टीच्या मधून धावत धाव घेतली. त्यामुळे पंच ब्रुस ऑक्सेनफोर्ड यांनी न्यूझीलंडला ५ धावा बहाल केल्या.
त्यामुळे जेव्हा भारताने पहिला डाव ५५७ धावांवर घोषित केला तेव्हा न्यूझीलंडने त्याच्या डावाची सुरुवात बिनबाद ५ धावांवरुन केली. हा सामना भारताने ३२१ धावांनी जिंकला होता.
३. शॉर्ट रन घेतल्याने श्रीलंका संघाला झाला होता ५ धावांचा दंड –
२०१८ ला पालेकेले येथे श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंका संघाला शॉर्ट रन घेतल्याने ५ धावांचा दंड झाला होता. झाले असे की श्रीलंका संघाकडून पहिल्या डावात सर्वाधिक ८५ धावा करणारा रोशन सिल्वाने जॅक लिचच्या गोलंदाजीवर कॅट शॉट मारला.
त्यावेळी तो चेंडू बाऊंड्रीलाईन पार करुन गेल्याचे वाटल्याने त्याने कोणतीही घाई केली नाही. रोशन सिल्वा तो चेंडू चौकार गेला हे समजून नॉन-स्ट्रायकर एन्डला बॅट न टेकवताच स्ट्रायकर एन्डला परत आला.
पण तो चेंडू मोईन अलीने चौकार जाण्यापासून थांबवला होता. त्यामुळे पंचांनी रोशन सिल्वाने शॉर्ट रन घेतल्याने स्पष्ट करत इंग्लंड संघाला ५ धावा दिल्या. या ५ धावा इंग्लंडच्या पहिल्या डावात सामील करण्यात आल्या. त्या सामन्यात इंग्लंडने ५७ धावांनी विजय मिळवला होता.
४. चेंडू छेडछाड करण्याचा आरोपामुळे दक्षिण आफ्रिकेला झाला ५ धावांचा दंड –
ऑक्टोबर २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेवर चेंडू छेडछाड करण्याचा आरोप झाल्याने पाकिस्तानला ५ धावा बहाल करण्यात आल्या होत्या. दुबईमध्ये पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात झालेल्या दुसऱ्या कसोटी दरम्यान ही घटना घडली होती.
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डू प्लेसिस क्षेत्ररक्षण करताना चेंडू त्याच्या ट्राऊझरच्या झिपजवळ चेंडू घासत असल्याचेे दिसले होते. त्यामुळे मैदानावरील पंच रॉड टकर आणि इयान गौल्ड तसेच टीव्ही पंच पॉल रायफेल यांनी चेंडू बदलला आणि पाकिस्तानला ५ धावा दिल्या होत्या.
या घटनेनंतर एबी डिविलियर्सने डू प्लेसिसला पाठिंबा देत त्याने काहीही चूकीचे केले नसल्याचे म्हटले होते. ही कसोटी दक्षिण आफ्रिकेने १ डाव आणि ९२ धावांनी जिंकली होती.
५. पाकिस्तानला झाला २ वेळा ५ धावांचा दंड –
२०१८ च्या महिला टी२० विश्वचषकात गयानाला झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानला २ वेळा खेळपट्टीच्या मधून धावल्याबद्दल ५ धावांचा दंड झाला होता. पाकिस्ताकडून बिस्माह मारुफ आणि निदा दार या दोघींनीही अर्धशतकी खेळी केली होती. पण या दोघींनाही खेळपट्टीच्या मधून धावल्याबद्दल पंचांनी ताकीद दिली होती.
परंतू १८ व्या षटकात त्यांच्याकडून खेळपट्टीवरुन धावण्याची पुन्हा चूक झाली. त्यावेळी त्यांना ५ धावांची पेनल्टी बसली. तर त्यानंतर पुन्हा अशीच चूक २० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नाहीदा खान आणि सिद्रा नवाझ धाव घेण्याचा प्रयत्न करताना झाली. त्यामुळे दुसऱ्यांदा त्यांना ५ धावांची पेनल्टी बसली.
या सामन्यात पाकिस्तानने २० षटकात प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १३३ धावा केल्या होत्या आणि भारताला १३४ धावांचे आव्हान दिले होते. पण पाकिस्तानला १० धावांची पेनल्टी बसल्याने भारताने या धावांच्या आव्हानाचा पाठलाग बिनबाद १० धावा अशा धावसंख्येवरुन सुरु केला. (Instance when 5 runs were awarded as penalty)