श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेत भारताचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. यजमान संघाने मालिका 2-0 ने जिंकली. तिन्ही सामने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळले गेले. पहिला सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर भारतीय संघाला लंकेच्या गोलंदाजांनी लोळवत दोन्ही सामने जिंकले. तिन्ही सामन्यांमध्ये भारताचे फलंदाज श्रीलंकेच्या फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकले.
या वनडे मालिका विजयासह श्रीलंकेचा 27 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आला. 1997 नंतर भारताविरुद्ध वनडे मालिका जिंकण्यात संघ यशस्वी ठरला आहे. टीम इंडिया आतापर्यंत श्रीलंकेविरुद्ध 21 एकदिवसीय मालिका खेळली आहे. या दरम्यान भारताने 15 विजय मिळवले आहेत. तर तीन मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. लंकन संघ केवळ तिसऱ्यांदा मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. त्याने 1993, 1997 आणि आता 2024 मध्ये मालिका जिंकल्या आहेत.
माजी कर्णधार आणि विद्यमान अंतरिम प्रशिक्षक सनथ जयसूर्याने श्रीलंकेची 27 वर्षांची प्रतीक्षा संपवण्यात मोठे योगदान दिले आहे. आपल्या काळातील सर्वात स्फोटक फलंदाज मानल्या जाणाऱ्या जयसूर्याने अनेक अनुभवी खेळाडू नसतानाही संघाला मालिकेत विजय मिळवून दिला. त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देऊन विजयासाठी प्रेरित केले. जयसूर्याला भारताविरुद्धच्या दाैऱ्यासाठी आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
योगायोगाने 1997 मध्ये मालिका जिंकणाऱ्या संघाचा जयसूर्याही सदस्य होता. त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने तुफानी फलंदाजी केली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने 52 चेंडूत 73 धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने 56 चेंडूत 66 धावांची खेळी केली. मग त्याने कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि सचिन तेंडुलकरसारख्या खेळाडूंनी सजलेल्या संघाचा पराभव केला. यावेळी प्रशिक्षक म्हणून त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंची मने तोडली.
हेही वाचा-
मोठी बातमी! ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्याने, विनेश फोगटची कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा..!
“जोपर्यंत मी कर्णधार आहे तोपर्यंत…” पराभवानंतर रोहित शर्मानं दिला खेळाडूंना पाठिंबा
षटकार होता पण आऊट दिलं, गिलनं घेतलेल्या झेलमुळे चर्चांना उधाण