ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर भारतीय संघाने अविश्वसनीय कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला ३ गडी राखून धूळ चारली. तसेच या विजयासह चार सामन्यांची कसोटी मालिका देखील २-१ अशा फरकाने आपल्या नावे केली. मात्र या सामन्यादरम्यान भारताचा पदार्पणवीर टी नटराजन ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसमोर फलंदाजी करत असताना भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे डाव घोषित करू इच्छित होता. भारताचा ऑफस्पिनर आर अश्विन आणि फिल्डींग कोच आर श्रीधर यांनी हा खुलासा केला आहे.
“दुखापत होण्याची वाटत होती भीती”
भारतीय संघाला संपूर्ण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दुखापतींनी सतावले होते. भारताचे अनेक प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेले होते. त्यामुळे शेवटच्या कसोटी सामन्यात तर तब्बल सहा नवोदित खेळाडूंसह भारत मैदानात उतरला होता. अशा परिस्थितीत टी नटराजन ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर फलंदाजी करताना अडखळत असल्याचे पाहून त्याला दुखापत होऊ नये, अशी भीती भारतीय संघ व्यवस्थापनाला वाटत होती.
आर श्रीधर यांच्या युट्यूब चॅनलवर यासंदर्भात बोलताना आर अश्विन म्हणाला, “ज्यावेळी टी नटराजन मिचेल स्टार्कचे संपूर्ण षटक खेळत होता, त्यावेळी संघ व्यवस्थापन अस्वस्थ होते. इतकेच नाही तर कर्णधार रहाणेने नटराजनला दुखापत होऊ नये यासाठी डाव घोषित करण्याचाही विचार केला होता.”
आर श्रीधर यांनी या बाबीला पुष्टी देत म्हंटले, “त्यावेळी रहाणे कोचिंग स्टाफच्या रूममध्ये आला होता आणि डाव घोषित करूया असे म्हणाला होता. कारण नटराजन देखील दुखापतग्रस्त झाला असता तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करण्यासाठी आमच्याकडे केवळ तीन गोलंदाज उपलब्ध राहिले असते, असे तो म्हणत होता.”
अश्विनने यावेळी नटराजनच्या फलंदाजीचे कौतुकही केले. नटराजनने ज्याप्रकारे हलक्या हातांनी डिफेन्स करून कॅच हवेत उडणार नाही याची काळजी घेतली, ते प्रशंसनीय होते, असे अश्विन म्हणाला.
महत्वाच्या बातम्या:
बिग बॅश लीगमधील हा फिरकीपटू लवकरच दिसेल आयपीएलमध्ये, शेन वाॅर्न यांनी वर्तविले भाकीत
क्या से क्या हो गया! दहा दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणारा टीम पेन झाला वॉटर बॉय