टी २० विश्वचषक २०२६ भारतीय संघाचा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन याला झिम्बाब्वे दौऱ्यातील भारताच्या टी २० संघातून वगळले आणि एकाच चर्चेला सुरूवात झाली. अनेकांनी निवड समितीच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहे. त्यामध्ये भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने सहभाग घेतला आहे.
सॅमसनने भारताच्या टी २० विश्वचषक विजयात महत्त्वाची भुमिका बजावली होती. त्यासाठी त्याला प्लेअऱ ऑफ द टुर्नामेंट म्हणूनही गौरविण्यात आले होते, मात्र भारताच्या शेवटच्या तीन सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला आणि त्याला बाकावर बसवण्यात आले.
सॅमसनने आयर्लंड दौऱ्यातील पहिल्या सामन्यात ५ धावा केल्या, तर दुसऱ्या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तसेच इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी २० मध्ये केवळ एक धावा काढून परतला. त्यामुळे दुसऱ्या टी २० मध्ये त्याला वगळले आणि वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली.
आता निवड समितीने सॅमसनची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड न करत वैभवला संधी दिली आहे. याबद्दलच रहाणेने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले, “संजू सॅमसनशी काहीतरी संवाद साधला जात असेल अशी आशा आहे. आपल्या अलीकडील टी २० विश्वचषक विजयाचा नायक असलेल्या खेळाडूला झिम्बाब्वे दौऱ्यासाठीच्या टी २० संघातून वगळण्यात आले आहे, ही गोष्ट मला विचित्र वाटते. त्याला लवकरच पुन्हा संघात पाहता येईल अशी आशा आहे.”
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारताच्या संघात प्रभसिमरन सिंग याला संधी देण्यात आली आहे. त्याची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे. त्याने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना सलामीला फलंदाज केली असून तो विकेटकीपरही आहे.
सॅमसनबरोबर इंग्लंड दौऱ्यात असलेल्या आणखी सहा खेळाडूंना झिम्बाब्वे दौऱ्यासाठी दुर्लक्षित केले आहे. हा दौरा २३ जुलैपासून सुरू होणार आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी २० मालिकेसाठी भारतीय संघ-
श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव आणि प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर).






