भारतीय संघ सध्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला असला, तरी दुसऱ्या कसोटी सामन्यात मात्र कोहली आणि कंपनीने यजमान संघावर चांगलेच वर्चस्व राखले होते.
भारतीय संघाच्या लॉर्ड्सवरील विजयानंतर सर्वत्र कौतुक केले जात होते. मात्र, भारतीय कर्णधार विराट कोहली गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. तसाच फॉर्म त्याचा या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांमध्येही राहिला. कोहलीच्या या मालिकेतील आतापर्यंतच्या ३ डावांमध्ये म्हणावी तशी कामगिरी झाली नाही. ज्यामध्ये कोहलीने केवळ ०, ४२ आणि २० अशा धावा केल्या.
त्यामुळे कोहलीच्या फलंदाजीवर सर्वत्र टीका केली जात होती. मात्र, या दरम्यान भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने कोहलीच्या समर्थनात वक्तव्य केले आहे. कोहलीने आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत एकूण ७० शतक ठोकले आहेत. मात्र २०१९ पासून कोहलीकडून एकही शतक आलेले नाही. २०२० पासून कोहलीने १० कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात कोहलीने २४ पेक्षाही कमीच्या सरासरीने केवळ ४०७ धावा केल्या आहेत.
कोहलीच्या समर्थनात सोनी स्पोर्ट्स सोबत बोलताना आगरकर म्हणाला, “आपल्याला आणखी वाट पाहणे गरजेचे आहे. तुम्ही फक्त ३ डावांमध्ये सध्याच्या काळातील सर्वात महान फलंदाजांपैकी एक असलेल्या फलंदाजाच्या खेळीवर शंका करू शकत नाही. २०१८ च्या मालिकेत विराट कोहलीने इंग्लंड विरुद्ध धावा केल्या होत्या. ज्यावेळी सगळे इंग्लिश फलंदाज होते. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने जेम्स अँडरसनच्या उत्कृष्ट गोलंदाजीचा देखील सामना केला होता.”
“तसेच दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात कोहलीने कठीण परिस्थितीत ४२ धावा केल्या होत्या. कोहलीसाठी आउट स्विंग गोलंदाजी करण्यात आली होती. अशा स्थितीत चेंडू स्विंग सुद्धा होतो, आणि सिम सुद्धा होतो. चौथ्या दिवसानंतर फलंदाजांना फलंदाजी करण्यास अडचण होते.”
“ज्यावेळी गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो. जसे की, सॅम करनने लॉर्ड्सच्या कसोटी सामन्यात केले होते. ते उत्तम गोलंदाजीचे चांगले उदाहरण होते. मला विश्वास आहे की, कोहली मोठी धावसंख्या करू इच्छित आहे, आणि त्याचे सर्व चाहते देखील त्याला मोठी खेळी करताना पाहू इच्छित आहे. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या आहेत. अशा वेळी आपल्याकडून धावा झाल्या नाही, तर आपण धावा करण्यासाठी आणखी उत्सुक होऊन जातो,” असेही आगरकर म्हणाला.
दरम्यान, इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना बुधवार (२५ ऑगस्ट) पासून लीड्सच्या हेडींग्ले मैदानात सुरू होणार आहे. भारतीय संघाने तेथे सराव सत्राला देखील सुरुवात केली आहे. भारतीय ताफ्यात सर्व खेळाडू तंदुरुस्त होऊन संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत. तर, दुसरीकडे इंग्लंडचे मात्र वेगळेच चित्र आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटीतून नाव मागे घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–आजच्याच दिवशी वाडेकरांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने इंग्लंड भूमीवर रचलेला इतिहास
–चौदा वर्षापूर्वी सचिन झाला होता नर्वस नाईंटीजचा शिकार, भोवलेला पंचांचा चुकीचा निर्णय
–हार्दिकचा रुबाबच न्यारा! महागडे घड्याळ घालून केली अबु-धाबीची सैर, किंमत ऐकून फिरतील डोळे