---Advertisement---

लोकलने प्रवास करणारा शार्दुल आता फिरवणार महागडी कार, आनंद महिंद्रांचे भारदस्त गिफ्ट मिळालं

On: शुक्रवार, एप्रिल 2, 2021 3:00 PM
---Advertisement---

काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिकेत २-१ अशा फरकाने पराभूत करण्याचा कारनामा केला होता. या विजयात अनेक युवा खेळाडूंनी मोलाची कामगिरी बजावली होती. या कामगिरीची दखल घेत महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, शुबमन गिल आणि नवदीप सैनी या युवा भारतीय क्रिकेटपटूंना बक्षीस म्हणून ‘महिंद्रा थार’ भेट देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार शार्दुल ठाकूरला त्याचे बक्षीस मिळाले आहे.

शार्दुलने मानले महिंद्रा यांचे आभार

शार्दुलने ‘महिंद्रा एसयुव्ही थार’ भेट म्हणून मिळताच सोशल मीडियावर पोस्ट करत आनंद महिंद्रा यांचे आभार मानले आहेत. त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे की ‘नवीन महिंद्रा थार आली आहे. ही कार खरच मोठी आहे आणि ही एसयुव्ही चालवून मला फार आनंद होत आहे. आपल्या देशातील तरूणांना प्रेरणा देईल अशी ही कृती आहे. श्री आनंद महिंद्रा यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही ऑस्ट्रेलियातील आमच्या कामगिरीची दखल घेतली.’

या ट्विटसह शार्दुलने त्याला मिळालेल्या थार बरोबर फोटोही शेअर केला आहे.

नटराजनलाही मिळाली थार भेट

शार्दुलप्रमाणे गुरुवारी (१ एप्रिल) टी नटराजनला देखील ‘थार एसयूव्ही’ कार भेट मिळाली आहे. ही भेट मिळाल्यानंतर नटराजननेही आनंद महिंद्रा यांना एक खास रिटर्न गिफ्ट दिले आहे. त्याने रिटर्न गिफ्ट म्हणून गॅबा येथे झालेल्या कसोटी सामन्यात घातलेली जर्सी स्वाक्षरी करुन महिंद्रा यांच्यासाठी दिली आहे.

कधीकाळी शार्दुल करत होता लोकलने प्रवास

मुंबईच्या अनेक खेळाडूंना त्यांच्या सुरवातीच्या दिवसात रेल्वेने प्रवास करावा लागला आहे, हे सर्वांनाच माहित आहे. त्यात शार्दुलचा समावेश आहे. तो कारकिर्दीच्या सुरुवातीपासून पालघर ते मुंबई हा लांबचा प्रवास लोकलने करायचा. यानंतर त्याला त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्यांच्या फ्लॅटमध्ये बोरिवलीत ठेवून घेतले होते. विशेष म्हणजे शार्दुल आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतरही काहीवेळेला लोकलने प्रवास करतो. २ वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिदा दौऱ्यावरुन परतल्यानंतर तो लोकलने घरी गेला होता.

 

ब्रिस्बेन कसोटीत शार्दुलचा दबदबा 

ऑस्ट्रेलिया २०२०-२१ दौऱ्यात ब्रिस्बेन येथे भारताने मिळवलेल्या विजयात शार्दुल ठाकूरचे योगदान मोठे होते. या कसोटी सामन्यात शार्दुलने पहिल्या डावात ११५ चेंडूत ६७ धावा केल्या होत्या. तसेच त्याने ६२ धावा करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर बरोबर १२३ धावांची भागीदारीही केली होती. त्याचबरोबर त्याने त्या सामन्यात एकूण ७ विकेट्सही घेतल्या होत्या.

हा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटचा कसोटी सामना होता. त्यावेळी ३२ वर्षात या स्टेडियमवर अपराजित राहिलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाची धूळ चारत भारताने इतिहास रचला होता. या स्टेडियमवर मिळवलेल्या विजयामुळे भारताने कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

विजयासाठी आसुसलेल्या आरसीबीचे ‘हे’ नवोदित धुरंधर मारणार मैदान; प्रशिक्षकाने केला दावा

अय्यरच्या खांद्याची पुढील आठवड्यात होणार सर्जरी, आयपीएलसह ‘या’ मोठ्या स्पर्धेलाही मुकण्याची शक्यता

क्रिकेट विश्वचषकाच्या गाजलेल्या जाहिराती, ज्या तुम्हाला आठवण करुन देतात तुमचं बालपण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---