भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कानपूर येथे पहिला कसोटी सामना सुरू असून, या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२७ नोव्हेंबर) भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. १२९ धावांपासून पुढे तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केलेल्या न्यूझीलंडला दुसऱ्या दिवशीच्या खेळाची पुनरावृत्ती करता आली नाही आणि १४२.३ षटकांमध्ये २९६ धावांवर न्यूझीलंडचा संघ सर्वबाद झाला. त्यामुळे यजमान भारताने पहिल्या डावात ४९ धावांची आघाडी घेतली. न्यूझीलंडला २९६ धावांवर रोखण्यात डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल याचा सिंहाचा वाटा राहिला. त्याने या डावात बळींचे पंचक घेत अनेक मोठे विक्रम आपल्या नावे केले.
अक्षरने पाडले न्यूझीलंडच्या डावाला खिंडार
कानपूर कसोटीमध्ये न्यूझीलंडच्या पहिल्या डावात ३४ षटके गोलंदाजी करताना ६२ धावा देत अक्षर पटेलने भारतीय संघासाठी सर्वाधिक ५ बळी घेतले. यामध्ये न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथम, रॉस टेलर, हेन्री निकोलस, टॉम ब्लंडल आणि टीम साऊदी यांचा समावेश आहे. अक्षरने कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात ५ बळी घेण्याची ही पाचवी वेळ आहे. यासह पहिल्या ४ कसोटीत सर्वाधिक वेळा बळींचे पंचक मिळवणारा तो भारताचा पहिला आणि जगातील चौथा गोलंदाज बनला आहे.
नव्या यादीत झाला अक्षरचा समावेश
अक्षरने या पाच बळींसह भारतीय गोलंदाजांच्या एका खास यादीत स्थान मिळवले. त्याच्या नावावर चार कसोटींच्या सात डावांमध्ये ३४ बळी जमा झाले आहेत. याचबरोबर तो सर्वात वेगवान ३० कसोटी बळी मिळवणारा दुसरा गोलंदाज ठरला. हा भारतीय विक्रम माजी फिरकी गोलंदाज नरेंद्र हिरवाणी यांच्या नावावर असून, त्यांनी १९८८ मध्ये केवळ ३ कसोटीत ही अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली होती.
या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी अष्टपैलू रवींद्र जडेजा असून, त्याने सहा सामन्यात ३० कसोटी बळी मिळवले होते. अव्वल क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन, माजी वेगवान गोलंदाज श्रीसंत, दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे, माजी फिरकीपटू दिलीप दोशी व सध्याचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी ७ कसोटीत ३० बळी आपल्या नावे केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
आठवणीतील सामना: भारत विंडीजला हरवून बनला होता हीरो कप विजेता, कुंबळेने घेतलेल्या ६ विकेट्स