भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड विरुद्धची चार कसोटी सामन्यांची मालिका ३-१ अशा फरकाने जिंकत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता भारताचा सामना १८ ते २२ जून दरम्यान इंग्लंडमधील साऊथहॅम्पटन येथे खेळवला जाईल. या ऐतिहासिक अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघासमोर सरावाची सर्वात मोठी समस्या उभी ठाकली आहे. कारण, आयपीएलमुळे भारतीय संघाला कसोटीसाठीची वेगळी तयारी करता येणार नाही.
आयपीएल खेळणार खेळाडू
सध्या भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर भारतीय संघातील सर्व खेळाडू आयपीएल खेळण्यात व्यस्त होतील. आयपीएलचा यंदाचा हंगाम ९ एप्रिल ते ३० मे पर्यंत खेळवला जाणार असल्याने, लाल चेंडूने भारतीय खेळाडूंना तितकासा सराव करता येणार नाही.
बीसीसीआय मोठे पथक पाठविण्याची शक्यता
भारतीय संघासमोर आणखी एक समस्या आहे की, या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघात एकही सराव सामना खेळणार नाही. त्यामुळे, बीसीसीआय या अंतिम सामन्यासाठी मोठा संघ पाठविण्याच्या तयारीत आहे. जेणेकरून भारतीय संघ आपल्या संघात विभागून सराव करू शकतो. तसेच, सराव सामने खेळू शकतो.
भारतीय संघ मोठे पथक पाठवू शकतो याचा अंदाज हॅम्पशायर काउंटीचे संचालक रॉड बेन्सग्रोव यांनी वर्तविला. त्यांच्या मते, “बीसीसीआय या अंतिम सामन्यासाठी मोठा संघ पाठविण्याची शक्यता आहे. कारण ते कोणत्याही प्रकारचा सराव सामना इथे खेळणार नाहीत. मोठा संघ आल्यास ते आपापसात काही सामने खेळू शकतात. दोन्ही संघ एकाच हॉटेलमध्ये वास्तव्य करतील. मात्र, मजले वेगवेगळे असतील.”
न्यूझीलंड खेळणार कसोटी मालिका
दुसरीकडे, न्यूझीलंड संघाला अशी कुठलीही समस्या नाही. न्यूझीलंड २ जूनपासून १४ जूनपर्यंत इंग्लंड विरुद्ध लॉर्डस व एजबॅस्टन येथे दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. त्यामुळे न्यूझीलंडला या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी वातावरणाचा योग्य अंदाज येईल.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१: चेन्नईचा संघ दिसणार नव्या अंदाजात! धोनीने केले नव्या जर्सीचे अनावरण
‘घरासमोर क्रिकेट खेळू नका’, असं बोलल्याच्या रागातून पुण्यात टोळक्याचा कुटूंबावर हल्ला