आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने काही दिवसांपूर्वीच पुढील आठ वर्षांच्या आयसीसी स्पर्धांची घोषणा केली होती. यात वनडे विश्वचषक, टी२० विश्वचषक, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धांचा समावेश होता. साल २०२४ पासून साल २०३२ पर्यंत या स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल.
आता या स्पर्धांच्या आयोजनासाठी आयसीसीच्या सदस्य देशांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय यातील तीन स्पर्धांच्या आयोजनासाठी प्रयत्नशील आहे. बीसीसीआयच्या शिखर समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाल्याचे समजते आहे.
‘या’ स्पर्धांच्या आयोजनासाठी बीसीसीआय उत्सुक
आयसीसी स्पर्धांच्या आयोजनाचे आठ वर्षांचे एक चक्र तयार करण्यात आले आहे. यातील तीन स्पर्धांचे भारतात आयोजन व्हावे, यासाठी बीसीसीआय प्रयत्न करणार आहे. या तीन स्पर्धांमध्ये एक चॅम्पियन्स ट्रॉफी, एक टी२० विश्वचषक आणि एक वनडे विश्वचषक यांचा समावेश आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती देतांना सांगितले की, “होय, बीसीसीआय २०२५ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी, २०२८ सालचा टी२० विश्वचषक आणि २०३१ सालचा वनडे विश्वचषक यांचे आयोजन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. बीसीसीआयच्या शिखर समितीत या प्रस्तावावर एकमत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.”
यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन २०१७ सालानंतर पहिल्यांदाच होणार आहे. २०१७ साली इंग्लंडमध्ये शेवटच्या वेळी ही स्पर्धा खेळवण्यात आली होती. मात्र त्यानंतर व्यस्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रमामुळे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नाही. मात्र आयसीसीने पुन्हा एकदा या स्पर्धेला परत आणण्याचे ठरवले आहे.
यावर बोलतांना बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “चॅम्पियन्स ट्रॉफी ही छोटेखानी स्पर्धा आहे. मात्र ती अतिशय लोकप्रिय देखील आहे. त्यामुळे २०२३ साली भारतात वनडे विश्वचषक झाल्यावर २०२५ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन भारतात व्हावे असे वाटणे अगदीच साहजिक आहे. भारत आज अशा स्थितीत आहे की जागतिक क्रिकेट स्पर्धा आम्ही दर दोन वर्षांनी देखील आयोजित करू शकतो. त्यामुळेच आम्ही तीन स्पर्धांच्या आयोजनासाठी प्रयत्न करणार आहोत.”
महत्त्वाच्या बातम्या –
निष्काळजी फटका मारून बाद झालेल्या रिषभ पंतवर भडकले नेटकरी, ‘असा’ घेतला समाचार
तब्बल ७०६ बळी घेणाऱ्या वॉर्नला मिळाला फिरकी गोलंदाजी शिकण्याचा सल्ला; सेहवागने दिले ‘असे’ उत्तर
WTC Final: भारताचा डाव उध्वस्त करणाऱ्या काईल जेमिसनच्या नावाची झाली इतिहासात नोंद