भारतीय संघ मॅंचेस्टरमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याच्या तयारीत जोरात व्यस्त आहे. ही मालिका जिंकण्यासाठी किंवा त्यात टिकून राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे, कारण 5 सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या 1-2 ने पिछाडीवर आहे. (IND vs ENG 4th Test Match)
या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा (Team india) वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohmmed Siraj) एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्याने स्पष्ट सांगितले आहे की, चौथा कसोटी सामन्यात भारताचा आघाडीचा आणि घातक गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार (Jasprit Bumrah) आहे.
सिराजने पत्रकार परिषदेमध्ये ही गोष्ट स्पष्ट केली. याआधी बुमराहच्या फिटनेसबाबत साशंकता होती की, तो विश्रांती घेईल आणि चौथा सामना खेळणार नाही. पण सिराजने हे सगळे तर्कवितर्क संपवले आणि सांगितले की, बुमराह हा सामना नक्की खेळणार आहे. बुमराहचं खेळणं भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, कारण तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि भारताच्या वेगवान गोलंदाजी युनिटचा मुख्य आधार आहे.
स्वतःच्या वर्कलोडबद्दल बोलताना सिराज म्हणाला, देवाने मला निरोगी ठेवले आहे. मी ही संधीसुध्दा मानतो आणि देशासाठी जास्तीत जास्त सामने खेळू इच्छितो. सिराजने इंग्लंडविरुद्ध चालू मालिकेत आतापर्यंत उत्कृष्ट प्रदर्शन केलं आहे. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह हे दोघेही या मालिकेतील सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरले आहेत.
आत्तापर्यंत झालेल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये सिराजने सर्वाधिक 13 विकेट्स घेतल्या आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर बुमराह आहे, ज्याने 12 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे या दोघांनीही एका सामन्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत.





