भारत आणि न्यूझीलंडमध्ये सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्याला शुक्रवारी (३ डिसेंबर) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर सुरूवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवसापासून न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने भारतीय फलंदाजांना त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्याने या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आणि स्वतःच्या नावावार अनेक विक्रमांची नोंद केली.
एजाज पटेलने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी चार विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या दिवसी सहा विकेट्स घेऊन भारतीय संघाला सर्वबाद केले. एजाज पटेल कसोटी सामन्याच्या एका डावात १० विकेट्स घेणार आतापर्यंतचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी, इंग्लंडचे जिम लेकर आणि भारताच्या अनिल कुंबळे यांनी अशाच प्रकारे कसोटीच्या एका डावात १० विकेट्स घेतल्या होत्या. त्याचसोबत एजाज भारतीय धरतीवरील कसोटी सामन्यात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे.
भारतात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंचा विचार केला, तर यामध्ये एजाज पटेल दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. एजाजने भारताविरुद्धच्या या सामन्यात ११९ धावा दिल्या आणि १० विकेट्स घेतल्या. भारतीय संघाचे दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे हे या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी १९९९ मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात एका डावात ७४ धावा देत १० विकेट्स घेतल्या होत्या. तर यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाचे माजी फिरकी गोलंदाज जस्सू पटेल यांचे नाव आहे. जस्सू पटेल यांनी १९५९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्याच्या एका डावात ६९ धावा दिल्या होत्या आणि ९ विकेट्स घेतलेल्या.
जस्सू पटेल यांनी ही कामगिरी त्यांच्या पाचव्या कसोटी सामन्यात केली होती. तर एजाज पटेलने ही कामगिरी त्याच्या ११ व्या कसोटी सामन्यात केली आहे.
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ ३२५ धावांवर सर्वबाद झाला. भारतासाठी सर्वाधिक धावा सलामीवीर मयंक अगरवालने केल्या. मयंकने ३११ चेंडूंचा सामना केला आणि १७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १५० धावा केल्या. तसेच अक्षर पटेलने (५२) देखील अर्धशतकी खेळी केली.