यंदाच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मधील दोन कसोटी सामने खेळले गेले आहेत. पहिल्या कसोटीत भारतीय संघ मोठा विजय मिळवण्यात यशस्वी ठरला होता. तर दुसऱ्या कसोटीत भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आहे. आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन शहरातील गाबा क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबाबत सीमेपलीकडून आवाज उठवला जात आहे.
पाकिस्तानचा माजी फलंदाज बासित अलीने मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. यासोबतच त्याने शमीच्या पुनरागमनावर टीम इंडियाच्या व्यवस्थापनावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. बासित अलीने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला, “मोहम्मद शमीची सध्या संघात गरज आहे. जर भारत चौथ्या कसोटीसाठी त्याला बोलावत असेल, तर त्याला बोलावून काही फायदा नाही. तिसऱ्या कसोटीसाठी त्याला ताबडतोब बोलवा. तुमला वेगवान आक्रमणाची गरज आहे. शमी ही काळाची गरज आहे.”
दुखापतीमुळे गेल्या एक वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या मोहम्मद शमीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. अलीकडेच त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केली. पण संघ व्यवस्थापन त्याच्या फिटनेसबाबत कोणतीही घाई करत नाहीये.
दुसऱ्या कसोटीनंतर कर्णधार रोहित शर्माने खुलासा केला की, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीदरम्यान मोहम्मद शमीने गुडघ्याला सूज आल्याची तक्रार केली होती. रोहित म्हणाला, “आम्ही शमीच्या पुनरागमनाबद्दल सावध आहोत. त्याच्या फिटनेसला आमची प्राथमिकता आहे. त्याने घाईघाईत खेळण्यासाठी परत यावे आणि पुन्हा दुखापत व्हावी, असे आम्हाला वाटत नाही.” आता अश्या परिस्थितीत आता संघ व्यवस्थापन मोहम्मद शमीला कधी संघात सामील करणार हे पाहणे रंजक असेल.
हेही वाचा-
रोहित शर्मा संघाच्या नेतृत्वात का फ्लॉप ठरतोय? माजी क्रिकेटपटूनं दिलं धक्कादायक उत्तर
मोहम्मद सिराज-ट्रॅव्हिस हेड यांच्यावर बंदी? दोघांमधील जोरदार वादानंतर आयसीसी उचलणार मोठं पाऊल
IND vs AUS: मोहम्मद सिराजच्या ‘त्या’ कृतीवर रोहित शर्माची साथ, म्हणाला “कर्णधार म्हणून पाठिंबा देणे….”






