भारतीय अंडर-19 संघ सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी आयुष म्हात्रे (Aayush Mhatre) याची संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली आहे. इंग्लंड दौऱ्यातसुद्धा आयुषच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने युवा वनडे मालिकेत इंग्लंडला 3-2 ने हरवलं होतं. तसंच, युवांच्या कसोटी मालिकेतदेखील भारताने सामने बरोबरीत आणले होते.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) दोन्ही संघात 3 वनडे आणि 2 रेड-बॉल म्हणजे कसोटीप्रमाणे सामने खेळवले जाणार आहेत. इंग्लंड दौऱ्यात उपकर्णधार असलेला अभिज्ञान कुंडू याला या वेळी संघात स्थान मिळालं असलं तरी त्याच्याकडून उपकर्णधारपद काढून ते विहान मल्होत्रा याच्याकडे दिलं गेलं आहे.
वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याने देखील संघात आपलं स्थान टिकवलं आहे. कसोटी मालिकेत त्याचा फारसा प्रभाव नसला तरी वनडे मालिकेत तो सर्वोत्तम फलंदाज ठरला होता. त्याने 5 डावांत 71 च्या सरासरीने 355 धावा केल्या होत्या. त्याचप्रमाणे राहुल कुमार, हरवंश सिंह, आर. एस. अंबरिश, कनिष्क चौहान आणि हेनिल पटेल यांनीही संघात आपली जागा कायम राखली आहे.
या दौऱ्यासाठी काही नव्या खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. त्यात किशन कुमार, उद्धव मोहन, अमन चौहान आणि खिलन पटेल यांचा समावेश आहे. इंग्लंड दौऱ्यात खिलन पटेल हा पायाच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे सहभागी होऊ शकला नव्हता.
अभिज्ञान कुंडू आणि हरवंश सिंह हे 18 खेळाडूंच्या या भारतीय संघात दोन यष्टीरक्षक आहेत, युद्धजीत गुहा, लक्ष्मण बी. के. किशोर, अलंकृत रपोल आणि अर्नव बग्गा यांना स्टँडबाय (रिजर्व) खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आलं आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय अंडर-19 संघ
आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंह (यष्टीरक्षक), आर. एस. अंबरिश, कनिष्क चौहान, नमन पुष्पक, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार, अनमोलजीत सिंह, खिलन पटेल, उद्धव मोहन, अमन चौहान.






