---Advertisement---

वाढदिवस विशेष- माहित नसलेला अंबाती रायडू

On: शुक्रवार, सप्टेंबर 23, 2022 9:26 AM
---Advertisement---

आज (23 सप्टेंबर) भारतीय संघाचा स्टार फलंदाज अंबाती रायडूचा 37वा वाढदिवस. एक असा खेळाडू ज्याकडे प्रचंड प्रतिभा असून त्याचे रुपांतर अनेक कारणांमुळे उत्तुंग कारकिर्दीत करता आले नसलेला खेळाडू.

भारताकडून जेमतेम 55 वनडे सामने खेळायला मिळालेल्या रायडूने त्या सामन्यांतही तब्बल 47.05च्या सरासरीने 1694 धावा केल्या. जगात फार थोडे क्रिकेटपटू असे आहेत ज्यांनी वनडेत 50पेक्षा जास्त डाव खेळताना 47 किंवा त्यापेक्षा अधिकची सरासरी राखली आहे.

अशा या प्रतिभाशाली खेळाडूबद्दल या काही खास गोष्टी –

-रायडूने जेव्हा मोठ्या स्तरावर क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा त्याची तुलना सचिन तेंडूलकरशी केली जात होती. पण सातत्याने वादांच्या भोवऱ्यात अडकल्याने रायडूची कारकिर्द हवी तशी बहरली नाही.

-अंबाती रायडू हा असा क्रिकेटपटू आहे जो फोन वापरत नाही. याचा खूलासा त्याने एकदा हरभजन सिंग होस्ट करत असलेल्या ‘क्विक हिल भज्जी ब्लास्ट विथ सीएसके’ या शोमध्ये केला होता.

– अंबाती रायडूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 2001-02मध्ये हैद्राबाद संघाकडून खेळण्यास सुरुवात केली होती. पण 2005 मध्ये हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनशी वाद झाल्याने तो त्यावर्षी आंध्रप्रदेशकडून क्रिकेट खेळला. पण त्याला आंध्रप्रदेशकडून अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे तो परत हैद्राबाद संघात परतला.

– अंबाती रायडू 19 वर्षांखालील भारतीय संघाकडून खेळला आहे. 2004 ला झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात तो भारतीय संघाचा कर्णधार होता. विशेष म्हणजे या संघात सुरेश रैना, इरफान पठाण, दिनेश कार्तिक, आरपी सिंग, शिखर धवन हे खेळाडू देखील होते. या सर्वांनी पुढे जाऊन वरिष्ठ भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.

– 2007 मध्ये रायडूने इंडियन क्रिकेट लीग(आयसीएल) खेळण्यासाठी करार केला होता. त्यामुळे त्याच्यावर बीसीसीआयने बंदी घातली होती. त्यानंतर 2009 ला बीसीसीआयने रायडूला आयसीएलचा करार संपल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची संधी दिली.

– 2011-12मध्ये रायडू हैद्राबाद संघाची रणजी ट्रॉफीमध्ये प्लेट डीव्हिजनमध्ये घसरण झाल्यानंतर बडोदा संघाकडून खेळला.

– अखेर जूलै 2013 मध्ये रायडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने झिम्बाब्वे विरुद्ध 24 जूलै 2013 ला वरिष्ठ भारतीय संघाकडून पहिला वनडे सामना खेळला. त्यानंतर तो 7 सप्टेंबर 2014 ला इंग्लंड विरुद्ध भारतीय संघाकडून पहिला टी20 सामना खेळला. 

– इंग्लंड आणि वेल्स येथे जून-जूलैमध्ये पार पडलेल्या 2019 वनडे विश्वचषकात रायडूला भारतीय संघात संधी मिळाली नव्हती. त्यानंतर रायडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा तडकाफडकी निर्णय घेतला होता. पण त्यानंतर त्याने निवृत्तीच्या निर्णयावर पुन्हा विचार करत ऑगस्टच्या अखेरीस निवृत्ती मागे घेतली.

– तसेच रायडूने नोव्हेंबर 2018 मध्ये देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

-जानेवारी 2019मध्ये आयसीसीने रायडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास मनाई केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात जानेवारीमध्ये पार पडलेल्या वनडे मालिकेदरम्यान रायडूची गोलंदाजी शैली संशयित असल्याचे आयसीसीला आढळून आले होते. त्यानंतर त्यांनी त्याला चाचणीला सामोरे जाण्यास बजावले होते. पण तो चाचणीसाठी उपस्थित न राहिल्याने आयसीसीने रायडूवर 4.2च्या नियमानुसार गोलंदाजी करण्यास बंदी घातली. 

हेही वाचा-

अविश्वसनीय गुणवत्ता असूनही संपूर्ण कारकीर्दीत वादग्रस्त राहिलेला अंबाती रायडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment