---Advertisement---

तब्बल ५६ वर्षांनंतर टीम इंडियाविरुद्ध प्रतिस्पर्धी ओपनर्सने केला ‘असा’ मोठा कारनामा

On: सोमवार, मार्च 2, 2020 11:34 AM
---Advertisement---

क्राईस्टचर्च। आज(2 मार्च) भारताला न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात 7 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. हेगली ओव्हल स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात विजय मिळवण्याबरोबरच न्यूझीलंडने 2 सामन्यांची कसोटी मालिका 2-0ने जिंकत भारताला व्हाईटवॉश दिला.

भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान न्यूझीलंडने दुसऱ्या डावाच्या 36 व्या षटकात 3 विकेटच्या मोबदल्यात सहज पार करत सामना खिशात घातला. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडेलने भक्कम सलामी भागीदारी रचत न्यूझीलंडच्या विजयाचा पाया रचला होता.

या दोघांनीही अर्धशतकी खेळी करण्याबरोबरच पहिल्या विकेटसाठी 103 धावांची शतकी भागीदारी रचली. लॅथमने  74 चेडूंत 52 धावांची तर ब्लंडेलने 113 चेंडूत 55 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताविरुद्ध कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात प्रतिस्पर्धी संघाच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतके करण्याची ही तिसरीच वेळ आहे.

याआधी असे शेवटचे 56 वर्षांपूर्वी झाले होते. 1964 ला 21 ते 26 जानेवारी दरम्यान भारत विरुद्ध इंग्लंड संघात मुंबईला पार पडलेल्या सामन्यात इंग्लंडच्या ब्रायन बोलस आणि जिमी बिंक्स या सलामीवारांनी अनुक्रमे 57 आणि 55 धावा चौथ्या डावात केल्या होत्या. हा सामना अनिर्णित राहिला होता.

तसेच त्याआधी 1953 ला 21 ते 28 जानेवारी दरम्यान पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या ऍलन रे आणि जेफ्री स्टोलमेयर या सलामीवीरांनी चौथ्या डावात अनुक्रमे नाबाद 63 आणि 76 धावांची खेळी केली होती. हा सामनाही अनिर्णित राहिला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---