भारत विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यातील पहिला दिवस (४ ऑगस्ट) भारतीय गोलंदाजांच्या नावावर राहिला. तर सामन्याचा दुसऱ्या दिवशी (५ ऑगस्ट) इंग्लंड संघातील गोलंदाजांनी ४ भारतीय फलंदाजांना माघारी धाडले आहे. तरीदेखील हा सामना अद्याप भारतीय संघाच्या हातात आहे. केएल राहूल आणि रिषभ पंत हे दोघेही मैदानावर टिकून आहेत.
दरम्यान जेव्हा रिषभ पंत फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला, तेव्हा वेस्ट इंडीज संघाचा माजी कर्णधार ब्रायन लारा याला भरपूर आनंद झाला आणि त्यांनी असे काही ट्वीट केले ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १८३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाचे ४ फलंदाज ११२ धावांवर माघारी परतले आहेत. सध्या केएल राहुल नाबाद ५७ तर रिषभ पंत नाबाद ७ धावांवर खेळत आहेत. डावातील ४४ व्या षटकात उपकर्णधार अजिंक्य रहाणे (५ धावा) बाद झाल्यानंतर रिषभ पंत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.
रिषभ पंत फलंदाजीला येताच वेस्ट इंडिज संघाचे माजी कर्णधार ब्रायन लारा यांनी ट्विट करत म्हटले की, “अगदी असच रिषभ पंत. त्यांच्यावर हल्लाबोल कर. आक्रमण करणे सुरू ठेव. धावफलक हलता राहू दे.”
That’s it @RishabhPant17 take the attack to them!! Keep the scoreboard ticking over.
— Brian Lara (@BrianLara) August 5, 2021
ब्रायन लारा यांनी हे ट्विट केले कारण रिषभ पंतने फलंदाजीला येताच जेम्स अँडरसनवर जोरदार आक्रमण केले होते. भारतीय कसोटीपटू चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांचा अँडरसनपुढे जास्त वेळ टिकाव लागला नाही. तर उप कर्णधार अजिंक्य रहाणेही अवघे ५ चेंडू खेळू शकला होता. त्यामुळे जेव्हा रिषभ पंत फलंदाजीला आला तेव्हा सर्वांना वाटले होते की, तो संथ सुरुवात करेल. परंतु रिषभने असे काही केले नाही. (Brian Lara tweet went viral on social media)
भारतीय संघाकडून मजबूत आघाडीच्या अपेक्षा
भारताचे ४ फलंदाज माघारी परतले असतील तरी देखील भारतीय संघ या सामन्यात मजबूत स्थितीत आहे. भारतीय संघाकडून रोहित शर्मा ३६ धावा करत माघारी परतला होता; तर विराट कोहली,अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे फलंदाज या डावात फ्लॉप ठरले आहेत. परंतु रिषभ पंतने या सामन्यात ताबडतोड ४०-५० धावांची खेळी केली; तर भारतीय संघ आणखी चांगल्या स्थितीत येऊ शकतो. तसेच केएल राहुल देखील चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे.
नाबाद ५७ धावांवर फलंदाजी करत असलेल्या केएल राहुलकडे तिसऱ्या दिवशी शतक झळकावण्याची सुवर्णसंधी असणार आहे. राहुलने आपले पहीलेवहिले शतक इंग्लंडमध्येच झळकावले होते. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे थांबवण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
अन् इंग्लंडच्या प्रशिक्षकाचा आनंद एका क्षणात बदलला दु:खात, बघा नक्की असं काय घडलं?
इंग्लंड संघाला जबर धक्का! ‘हा’ गोलंदाज टी२० विश्वचषकासह ऍशेसमधून बाहेर
जिमीने गाठला जम्बो! विराटला बाद करताच अँडरसनने केली कुंबळेशी बरोबरी






