भारतीय क्रिकेट संघाने 2007 साली पहिला टी20 विश्वचषक उंचावला होता. मात्र, त्यानंतर भारताच्या पदरात टी20 विश्वचषक पडलाच नाही. आता क्रिकेटचा हा महाकुंभमेळा म्हणजेच टी20 विश्वचषक 2022 ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात भरवला जात आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ भाग घेतील. यातील सर्वच संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आकाश पाताळ एक करताना दिसतील. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी रोहित शर्मा याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) हा भारतीय संघाच्या कर्णधारासोबत सलामीवीर फलंदाजही आहे. त्याच्याकडून मजबूत सुरुवात करण्याची अपेक्षा केली जाते. मात्र, काही महिन्यांपासून रोहितही खराब फॉर्माशी झुंज देत आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यांमध्ये त्याने दमदार सुरुवात केली आहे. मात्र, तो लगेच बाद होऊन संघाला संकटात सोडतो. अशात जर विश्वचषकातही त्याचा खराब फॉर्म असाच राहिला, तर ‘या’ 3 युवा खेळाडूंकडे भारतीय संघात त्याचा पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकते.
1. ईशान किशन
या यादीत अव्वलस्थानी नाव येते भारतीय युवा सलामीवीर ईशान किशन (Ishan Kishan) आहे. ईशान दीर्घ काळापासून भारतीय संघाशी जोडला गेला आहे. ईशान एक यष्टीरक्षक फलंदाज आहे, जो आगामी काळात रोहित शर्माची जागा घेऊ शकतो. आयपीएलमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणारा ईशान मुंबई इंडियन्सकडूनही सलामीला फलंदाजी करतो. त्याने अनेकवेळा संघाला विजय मिळवून दिला आहे.
ईशानच्या प्रदर्शनाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत 6 वनडे सामने आणि 19 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वनडे क्रिकेट प्रकारात त्याने एकूण 144 धावा चोपल्या आहेत. मात्र, टी20 क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून तब्बल 543 धावा निघाल्या आहेत. या धावा करताना त्याने 4 अर्धशतकेही झळकावली आहेत. आयपीएलबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 75 सामने खेळले आहेत. त्यातील 70 डावात त्याने 12 अर्धशतकांच्या मदतीने 1870 धावा केल्या आहेत.
2. संजू सॅमसन
या यादीत दुसऱ्या स्थानी संजू सॅमसन (Sanju Samson) याचे नाव येते. संजू 2015पासून भारतीय संघासाठी टी20 क्रिकेटमध्ये खेळत आहे. मात्र, त्याला फार संधी मिळाली नाही. संजूही यष्टीरक्षक फलंदाज आहे, जो संघाला एक संतुलन मिळवून देईल. त्याच्याकडे कर्णधारपदाचाही अनुभव आहे. आयपीएलमध्ये संजू त्याच्या संघासाठी एक मॅचविनर खेळाडू आहे, जो भारतीय संघालाही सलामी फलंदाज म्हणून फायदा मिळवून देऊ शकतो.
संजूच्या क्रिकेट कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 7 वनडे आणि 16 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने वनडेत 44 च्या सरासरीने 176 धावा चोपल्या आहेत, तर टी20त त्याने एका अर्धशतकासह 296 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये तो अनुभवी खेळाडू आहे. त्याने 138 सामन्यात 29.14 च्या सरासरीने 3526 धावा चोप्लया आहेत. आयपीएलमधील यशस्वी फलंदाजांमध्ये संजूची गणना होते.
3. ऋतुराज गायकवाड
या यादीतील तिसरे आणि शेवटचे नाव म्हणजे ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) होय. ऋतुराजकडे रोहितचा पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकते. तो मागील बऱ्याच काळापासून भारतीय संघासोबत आहे. रोहित जर भारतीय संघातून बाहेर झाला, तर ऋतुराज त्याचा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. सातत्याने चांगले प्रदर्शन न करू शकल्याने त्याची संघातील जागा निश्चित होऊ शकली नाहीये. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला संधी मिळाली, पण त्याला खेळण्याची संधीच मिळाली नाही.
ऋतुराज गायकवाडच्या क्रिकेट कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 9 टी20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 18.87च्या सरासरीने 135 धावा चोपल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचाही समावेश आहे. दुसरीकडे, त्याच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 36 सामन्यात फलंदाजी करताना 37.72च्या सरासरीने 1207 धावा चोपल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याच्या नावावर एक आयपीएल शतकही आहे. 2021मध्ये त्याने दमदार प्रदर्शन केले होते. त्यासाठी तो ऑरेंज कॅपचा विजेताही ठरला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषक तर खेळायचाय, पण मोहम्मद शमीपुढे आहे ‘हे’ आव्हान; आता भारताचं कसं होणार?
ऐन विश्वचषकापूर्वी सूर्याचा चौथा क्रमांक धोक्यात! स्वतःच व्यक्त केली भीती