आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघात पार पडला. सामन्यामध्ये चेन्नईने २० धावांसह अप्रतिम विजय मिळवला. मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सामन्यात गैरहजर होता. त्याच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व कायरन पोलार्डने सकेले. तसेच संघासाठी महत्वाचा असणार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याही पहिल्या सामन्यात उपस्थित नव्हता. रोहित आणि पंड्या पहिल्या सामन्यात खेळले नसल्यामुळे तंदुरुस्तीविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. याविषयी मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी माहिती दिली आहे.
प्रशिक्षकांनी दिली माहिती
रोहित आणि पंड्याच्या अनुपस्थितीवर महेला जयवर्धनेंनी माध्यामांना माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “हार्दिक पंड्याला अस्वस्थ असल्याने त्रास झाला. मात्र, गंभीर असे काहीही नाही. ही फक्त एक खबरदारी आहे. रोहित शर्मा फलंदाजी करत होता, क्षेत्ररक्षण करत होता. मात्र, यूकेहून आल्यानंतर आम्हाला वाटले की त्याला अतिरिक्त विश्रांतीची गरज आहे. पुढील सामन्यासाठी तो तंदुरुस्त असेल.” प्रशिक्षक महेला जयवर्धनेंनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे की, कर्णधार रोहित शर्मा पुढच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.
हार्दिक पंड्या पुढच्या सामन्यासाठी उपस्थित राहिल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रशिक्षकांनी दिलेल्या माहितीमुळे चाहते आनंदी झाले आहे. मुंबई इंडियन्स त्यांचा पुढचा सामना २३ सप्टेंबरला खेळणार असून यावेळी त्यांच्यापुढे कोलकाता नाइट रायडर्स संघाचे आव्हान असणार आहे.
पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव
दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सवर दमदार विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात मुंबईला हरवल्यानंतर चेन्नईचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्लीला मागे टाकत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. सामन्यात चेन्नईची सुरुवात खराब झाली होती. मात्र, सलामीवीर ऋतुराज गायकवाडने ८८ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाची धावसंख्या १५७ पर्यंत पोहचवली. ऋतुराजला त्याच्या या दमदार फलंदाजीमुळे सामनावीर पुरस्कारही देण्यात आला आहे. मुंबई इंडियन्सची फलंदाजी आल्यानंतर चेन्नई सुपर किंग्च्यास गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले आणि मुंबईला लक्ष्यापर्यंत पोहचू दिले नाही. चेन्नईने या सामन्यात २० धावांनी विजय मिळवला.