जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचा फटका अनेक खेळांना बसला आहे. त्याचबरोबर आता कोरोनाचा फटका रणजी ट्रॉफीतील बंगाल आणि सौराष्ट्र संघाच्या अंतिम सामन्याला बसला आहे.
अंतिम सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशीचा सामना प्रेक्षकांशिवाय खेळण्यात येणार आहे.
बीसीसीआयचे (BCCI) महाव्यवस्थापक सबा करीम यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, “रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शेवटच्या दिवशी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येऊ दिले जाणार नाही. केवळ खेळाडू, सामना अधिकारी आणि मीडिया यांना परवानगी असेल.”
क्रीडा मंत्रालयाशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. क्रीडा मंत्रालयाने सर्व स्पोर्ट्स फेडरेशनला स्पर्धेदरम्यान मोठ्या संख्येने लोकांना एका ठिकाणी जमण्यापासून थांबविणे आणि आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांकडे लक्ष द्या, असे सांगितले होते.
रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रविरुद्ध बंगालकडून फलंदाजी करताना तीन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. यामध्ये सुदीप चॅटर्जी (81), वृद्धिमान साहा (64) आणि अनुस्तुप मुजूमदार (58) यांचा समावेश आहे. यावेळी गुरुवारी बंगालने पहिल्या डावात चौथ्या दिवसाखेर 6 बाद 354 धावा केल्या.
तत्पूर्वी सौराष्ट्र संघाने फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 425 धावा केल्या होत्या. त्यामुळे बंगाल संघाला पहिल्या डावातील आघाडीसाठी 71 धावांची आवश्यकता आहे. जो संघ पहिल्या डावात आघाडी घेईल तो 2019-20 हंगामाचा मानाच्या रणजी ट्रॉफीचा विजेता ठरणार आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
–आता हात धुतलेल्या प्रेक्षकांनाच मिळणार टीम इंडियाच्या सामन्याला संधी
–कॅप्टन कूल धोनीच्या 75 वर्षीय कूल चाहतीचा हा फोटो होतोय जोरदार व्हायरल