काश्मीरमध्ये चाहत्यांना तब्बल 38 वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेटचे सामने पाहायला मिळणार आहेत. यावेळी काश्मीरमध्ये शिखर धवन आणि दिनेश कार्तिकसारखी अनेक मोठी नावं खेळताना दिसतील.
वास्तविक, 20 सप्टेंबरपासून काश्मीरमध्ये लिजेंड्स लीग क्रिकेटचं (LLC) आयोजन करण्यात येणार आहे. या लीगचा हा तिसरा हंगाम आहे. यंदा या लीगमध्ये शिखर धवन आणि कार्तिकसह अनेक दिग्गज क्रिकेटपटू मैदानात उतरतील. स्पर्धेसाठी एकूण 200 खेळाडूंचा पूल तयार करण्यात आला होता.
याआधी काश्मीरमध्ये 38 वर्षांपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शेवटचा वनडे सामना खेळला गेला होता. तेव्हापासून येथे एकही आंतरराष्ट्रीय सामना झालेला नाही. आता लिजेंड क्रिकेट लीगच्या माध्यमातून काश्मीरमध्ये क्रिकेटचं वातावरण निर्माण करण्याचं काम केलं जात आहे.
शेवटच्या वेळी सप्टेंबर 1986 मध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 3 गडी राखून पराभव केला होता. हा सामना श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर झाला होता. यावेळी येथे फ्रँचायझी लीगचं आयोजन होणार आहे, जी 20 सप्टेंबरपासून सुरू होईल. या लीगमध्ये 6 संघ 25 सामने खेळणार आहेत. 16 ऑक्टोबर रोजी अव्वल दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळला जाईल. अंतिम सामना श्रीनगरच्या बक्षी स्टेडियमवर होणार आहे.
लिजेंड्स लीग क्रिकेटचा मागील हंगाम खूपच यशस्वी ठरला होता. गेल्या हंगामात भारतातील 18 कोटी लोकांनी ही लीग पाहिली होती. गेल्या वेळी सुरेश रैना, आरोन फिंच, मार्टिन गप्टिल, भारताचे विद्यमान प्रशिक्षक गौतम गंभीर, ख्रिस गेल, हाशिम आमला, रॉस टेलर यांसारखे दिग्गज लीगमध्ये सहभागी झाले होते.
काश्मीरमध्ये आतापर्यंत फक्त 2 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. हे दोन्ही एकदिवसीय सामने होते, जे श्रीनगरमध्ये झाले. पहिला सामना 13 ऑक्टोबर 1983 रोजी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झाला. वेस्ट इंडिजनं हा सामना 28 धावांनी जिंकला होता. यानंतर 1986 मध्ये झालेल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला.
हेही वाचा –
“विराट कोहलीशिवाय आपण 2011 चा वर्ल्ड कप जिंकू शकलो नसतो!”, माजी खेळाडूनं स्पष्टच सांगितलं
भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी स्टार फलंदाज करतोय गोलंदाजी! सुनील नारायणच्या स्टाईलची हुबेहूब नक्कल
स्टार फुटबॉलपटू किलियन एमबाप्पेचं ट्विटर अकाऊंट हॅक! रोनाल्डो, मेस्सीवरील वादग्रस्त पोस्ट व्हायरल