Rohit Sharma vs Hardik Pandya: आयपीएल 2024 हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही महिने उरले आहेत. मात्र, त्यापूर्वी सर्वात यशस्वी फ्रँचायझी असलेल्या मुंबई इंडियन्स संघाच्या गोटातून धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. यावरून असे दिसते की, संघात सर्वकाही आलबेल नाहीये. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा याला हटवून हार्दिक पंड्या याच्या हातात संघाचे कर्णधारपद सोपवले गेले. या बातमीने लाखो चाहत्यांसह संघाच्या सदस्यांनाही धक्का बसला आहे. कदाचित यावरूनच मुंबईचा सदस्य आणि भारताचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादव यानेही सोशल मीडियावर लक्षवेधी पोस्ट शेअर केली.
मुंबई इंडियन्समध्ये गडबड?
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने हार्दिक पंड्या (Hardik Pandy) याला गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाकडून ट्रेड करत ताफ्यात घेतले. मात्र, यानंतर एक महिन्याने त्याच्या खांद्यावर थेट कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. अशात हार्दिकच्या पुनरागमनानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा संघाचा पहिला खेळाडू नाहीये, ज्याने कोड्यात टाकणारी पोस्ट केली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईचा वरिष्ठ सदस्य जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यानेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांना कोड्यात टाकले होते. त्यामुळे या पोस्ट हार्दिकच्या पुनरागमनाशी जोडल्या जात आहेत. खरं तर, सूर्यकुमार यादव आयपीएलच्या मागील हंगामात संघाचा उपकर्णधार होता. तसेच, रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या अनुपस्थितीत त्याने काही सामन्यात नेतृत्वही केले होते.
एवढंच काय तर, देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचा माजी कर्णधार आणि भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर (Wasim Jaffer) हादेखील यावर व्यक्त झाला. तो म्हणाला की, “काही खेळाडू असे होते, जे कर्णधार बनण्यासाठी आशावादी होते. त्यात सूर्यकुमार यादव आहे, जो भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. तो एका संधीच्या शोधात होता. कारण, अलीकडेच त्याने भारताचे चांगले नेतृत्व केले आहे.”
रोहितवर अन्याय?
पुढे बोलताना जाफर म्हणाला होता की, “मला आश्चर्य वाटते की, मुंबई इंडियन्स इतक्या लवकर रोहित शर्मावरून पुढे गेली. हे इतक्या लवकर घडल्यामुळे मीही हैराण आहे. जेव्हा त्याला ट्रेट केले, तेव्हा कदाचित हार्दिकला हे सांगण्यात आले होते की, तो कर्णधाराच्या रूपात येणार आहे. मात्र, याविषयी रोहितला सांगितले गेले होते की नाही, याविषयी मला माहिती नाही.”
दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज एबी डिविलियर्स (AB De Villiers) यानेही म्हटले की, “हार्दिक पंड्या आपल्या आयपीएल कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच मुंबईचा भाग होता. त्याच्या संघातील पुनरागमनावर अशा नकारात्मक प्रतिक्रिया पाहणे थोडे हैराण करणारे आहे.”
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे रोहित शर्मा 2011मध्ये मुंबईशी जोडला गेला होता. तसेच, 2013मध्ये त्याला मुंबईचा कर्णधार बनवले गेले होते. तसेच, हार्दिक पंड्याने आयपीएल कारकीर्दीची सुरुवात 2015मध्ये मुंबई इंडियन्ससोबत केली होती. यादरम्यान रोहितने मुंबईला पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली असतानाही संघाने असा निर्णय घेतल्यामुळे रोहितवर अन्याय झाल्याचे बोलले जात आहे. (cricketer rohit sharma replaced by hardik pandya as captain rift in mumbai indians ipl 2024)
हेही वाचा-
IPL 2024 पूर्वी धक्कादायक बातमी! BCCIने भारताच्या इंटरनॅशनल खेळाडूवर घातली बंदी, करू शकणार नाही ‘हे’ काम
हैदराबादने ज्या पठ्ठ्याला केले रिलीज, त्यानेच केली 442च्या स्ट्राईक रेटने वादळी फलंदाजी; फक्त 7 चेंडूत…