ऑस्ट्रेलिया आणि भारत संघातील ३ सामन्यांची वनडे मालिका संपली आहे. यातील पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर भारताने तिसरा वनडे जिंकत व्हाईटवॉश टाळला. कॅनबेरा येथे खेळलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने १३ धावांनी विजय मिळवला. यानंतर भारतीय संघाच्या विजयाचा नायक ठरलेला वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने डेविड वॉर्नरबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

भारताने दिलेल्या ३०३ धावांचा पाठलाग करणारा ऑस्ट्रेलिया संघ २८९ धावांवरच संपुष्टात आला. भारतीय संघाकडून ठाकूरने स्टीव्ह स्मिथसह सर्वाधिक तीन विकेट्स आपल्या नावावर केल्या. वॉर्नर दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर होता.

सामन्यानंतर ठाकूरने म्हटले की, वॉर्नरच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला मानसिक फायदा झाला. तो म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर वॉर्नरच्या अनुपस्थितीमुळे आमच्याकडे त्यांना रोखण्याची संधी होती. आम्ही तेच केले. या विजयामुळे आम्हाला टी२० मालिकेत लय मिळवण्यास मदत मिळेल.”

पहिल्या दोन वनडे सामन्यात ऑस्ट्रेलिया संघासाठी वॉर्नर आणि कर्णधार ऍरॉन फिंच यांनी शतकी भागिदारी रचली होती. परंतु तिसऱ्या वनडेत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया संघाला शतकी भागिदारी रचता आली नाही.

तरीही, सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून त्यांनी ही वनडे मालिका २-१ ने आपल्या नावावर केली. दोन्हीही संघांमध्ये तीन सामन्यांची टी२० मालिका शुक्रवारपासून (४ डिसेंबर) सुरू होणार आहे.