कोलंबो। भारत विरुद्ध श्रीलंका संघात मंगळवारी (२० जुलै) वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने ३ विकेट्सने विजय मिळवत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली. भारताच्या या विजयात दीपक चाहरने अष्टपैलू कामगिरी करत मोलाचा वाटा उचलला.
या सामन्यात श्रीलंकेने अविष्का फर्नांडो आणि चरिथ असलंका यांच्या अर्धशतकाच्या जोरावर ५० षटकांत ९ बाद २७५ धावा केल्या आणि भारताला २७६ धावांचे विजयासाठी आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १९३ धावांवर ७ विकेट्स गमावल्या होत्या. पण असे असतानाही ८ व्या क्रमांकावर खेळणाऱ्या दीपक चाहरने नाबाद अर्धशतकी खेळी करत भारताला ४९.१ षटकात विजय मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले.
त्याला भुवनेश्वर कुमारने नाबाद १९ धावा करत चांगली साथ दिली. दीपक चाहरने ८२ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ६९ धावा केल्या. तसेच भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहरमध्ये ८ व्या विकेटसाठी नाबाद ८४ धावांची भागीदारी झाली.
दीपक चाहरने त्याच्या नाबाद अर्धशतकी खेळीसह काही खास विक्रमांनाही गवसणी घातली आहे. त्याने काही दिग्गज क्रिकेटपटूंच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.
श्रीलंका विरुद्ध ही कामगिरी करणारा दुसरा क्रिकेटपटू
वनडेमध्ये श्रीलंकेत ८ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत अर्धशतक करणारा दीपक दुसराच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम २००९ साली रविंद्र जडेजाने केला होता. त्याने कोलंबो येथेच खेळताना नाबाद ६० धावांची खेळी केली होती.
धावांचा यशस्वी पाठलाग करताना तळाती क्रमांकवर सर्वोच्च धावा
वनडेमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना ८ व्या किंवा त्याखालील क्रमांकावर सर्वोच्च धावांची खेळी करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत दीपकने अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्याने या यादीत भुवनेश्वर कुमारला मागे टाकले आहे. भुवनेश्वर कुमारने २०१७ साली श्रीलंकेविरुद्ध नाबाद ५३ धावांची खेळी ८ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना केली होती. तसेच या यादीत दीपक आणि भुवनेश्वर कुमारनंतर हरभजन सिंग (४१ धावा), सुरेश रैना (नाबाद ३९ धावा), झहीर खान (नाबाद ३४ धावा) यांचा क्रमांक लागतो.
भारताकडून ८ व्या क्रमांकावर सर्वाधिक धावा
भारताकडून वनडेत ८ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वोच्च धावांची खेळी करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत दीपक दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने या यादीत अजित अगरकरला मागे टाकले आहे. अगरकरने २००० साली झिम्बाब्वे विरुद्ध वनडेत ८ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद ६७ धावा केल्या होत्या. या यादीत अव्वल क्रमांकावर रविंद्र जडेजा आहे. त्याने २०१९ च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ७७ धावांची खेळी केली होती.
वनडेत ८ व्या क्रमांकावर अर्धशतक करणाऱ्या दिग्गजांच्या यादीत सामील
भारताकडून आत्तापर्यंत वनडेत ८ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना ७ क्रिकेटपटूंनी किमान १ अर्धशतक करण्याचा कारनामा केला आहे. या ७ क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या रविंद्र जडेजाने ८ व्या क्रमांकावर सर्वाधिक ३ अर्धशतके झळकावली आहेत. तसेच अजित अगरकरने २ अर्धशतके झळकावली आहे, तर सुनील जोशी, कपिल देव, सबा करीम, इरफान पठाण आणि दीपक चाहरने प्रत्येक १ अर्धशतक झळकावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
काय करायचे पुजाराच्या फॉर्मला? सराव सामन्यात नवख्या फिरकीपटू पुढे टाकल्या नांग्या, पाहा व्हिडिओ