भारत आणि वेस्ट इंडिज(IND vs WI) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या मालिकेत संघात अनेक बदल पाहायला मिळाले असून, काही युवा खेळाडूंनाही संधी दिली आहे. त्यातच तीन खेळाडूंना सामन्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे युवा खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे. या सामन्यात गेल्या वर्षी क्रिकेट कारकीर्द संपायची भीती वाटत असलेल्या राजस्थानच्या फलंदाजाला म्हणजेच दीपक हुडाला (Deepak hooda) सुद्धा पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. त्याचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना ठरला.
२०१७-१८ साली दीपकची भारतीय संघात निवड करण्यात आली होती. परंतु त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळवता आले नाही. गेल्या वर्षात त्याला प्रचंड अडचणी आल्या. मागच्या जानेवारीमध्ये बडोदा क्रिकेट असोसिएशनने अनुशासनहीनतेचे कारण सांगत त्याला पूर्ण देशांतर्गत हंगामासाठी निलंबित केले होते. यानंतर त्याला कारकीर्द संपण्याची भीती वाटत होती. इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांनी हुडाला प्रोत्साहन दिले आणि आज त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने दीपक हुडाकडे पदार्पणाची कॅप दिली. यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि बाकी खेळाडूंनी त्याला मिठी मारली. गेले एक वर्ष हुडासाठी चढउतारांनी भरले होते. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीदरम्यान बडोद्यामध्ये पहिल्या सामन्यापूर्वी संघाचा कर्णधार कृणाल पंड्यासोबत वाद झाला. नंतर त्याने संघाचा बायो-बबल सोडला. त्यानंतर त्याने बडोदा क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहून कर्णधार कृणालवर गैरवर्तन केल्याचा आणि त्याची कारकीर्द खराब करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. याला अनुशासनहीन असे मानून बीसीएने त्याला पुर्ण हंगामासाठी निलंबित केले.
या वादानंतर दीपकने स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले. तो घरच्यांशी आणि मित्रांशी सुद्धा बोलत नव्हता. आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट होणार असे त्याला वाटले होते. पण नशिबाने त्याला साथ दिली आणि २६ जानेवारीचा दिवस त्याच्यासाठी खुप खास ठरला. त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. वाईट काळात त्याला इरफान आणि युसूफ पठाण यांनी नैराश्यातून बाहेर काढल्यामुळे त्यांचो खूप चांगली साथ मिळाली.
एका मुलाखतीत तो म्हणाला होता की , “बडोदा संघात झालेल्या वादामुळे मी पूर्णपणे तुटलो होतो. पण इरफान आणि युसूफ पठाण मला पुन्हा प्रशिक्षणासाठी घेऊन गेले. ते दोघे माझ्यासोबत बडोद्यात खुप वेळ नेटवर सराव करायचे. एक उत्तम मार्गदर्शक म्हणून त्यांनी फक्त खेळाविषयीच नाही तर जीवनाबद्दल सुद्धा बरच काही शिकवले. त्यांची शिकवण माझ्या कठीण काळात उपयोगी आली आणि मला उत्तम क्रिकेटपटू बनण्यास त्याची मदत झाली.”.
हुडाने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जसाठी चांगली कामगिरी केली आहे आणि बडोदा क्रिकेट संघाशी संबंध तोडल्यानंतर तो राजस्थानला गेला. त्याचा हा निर्णय योग्य होता. दीपकने गतवर्षी सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीच्या ६ सामन्यात २९४ धावा केल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याला राजस्थान संघाचा कर्णधार बनविण्यात आले होते. या स्पर्धेत त्याने कर्नाटकविरुद्ध शतक झळकावत ६ सामन्यात १९८ धावा केल्या होत्या.
दीपक हुडा भारतीय संघाचा फिनिशर होण्यास योग्य आहे. हुडा मधल्या फळीत कुठेही फलंदाजी करू शकतो. त्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता चांगली आहे. तो गोलंदाजीही उत्तम करतो. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २० तर टी२० मध्ये १७ आणि लिस्ट-ए मध्ये ३५ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
केवळ ८ धावा करूनही कोहली बनला आणखी एका विक्रमाचा ‘किंग’ (mahasports.in)