भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सिडनी क्रिकेट मैदानावरील तिसरा सामना आज अनिर्णीत अवस्थेत संपला. भारतीय संघाला शेवटच्या डावात ४०७ धावांचे आव्हान असताना ऑस्ट्रेलियन संघ सहज जिंकेल, अशीच शक्यता होती. मात्र भारतीय संघाने चार सत्र खेळून काढताना ५ बाद ३३४ धावा करत सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. या सामन्यानंतर हा निकाल पचवणे अवघड असल्याची प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने दिली.
“झेल सुटल्याने झाले नुकसान”
या सामन्याबद्दल बोलताना पेन म्हणाला, “आम्ही या सामन्यात अनेक संधी निर्माण केल्या. मात्र त्या संधींचा लाभ घेण्यात अपयशी ठरलो. त्यामुळेच हा निकाल पचवणे अवघड आहे. मागील दोन सामन्यात आम्ही आमचे सर्वोत्तम प्रदर्शन केले नव्हते. मात्र यावेळी त्यात सुधारणा करूनही अपेक्षित निकाल हाती न आल्याने आम्ही निराश आहोत. गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोख बजावली, मात्र झेल पकडण्यात आम्ही, विशेषतः मी अपयशी ठरलो. हे झेल सुटल्याने नक्कीच अधिक नुकसान झाले.”
या सामन्यात काही सकारात्मक गोष्टीही घडल्या, असे पेन म्हणाला. “गोलंदाजांची कामगिरी आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. त्यांनी अनेक संधी निर्माण केल्या. तसेच दोन युवा खेळाडू, विल पुकोवस्की आणि कॅमरून ग्रीन यांची कामगिरी देखील आश्वासक होती. आम्ही याच सकारात्मक बाबींकडे लक्ष देऊन ब्रिस्बेन कसोटीवर आता लक्ष देऊ”, असे पेन म्हणाला.
सिडनीतील तिसरा सामना अनिर्णीत राहिल्याने मालिकेत १-१ अशी बरोबरी कायम आहे. आता मालिकेतील चौथा आणि निर्णायक कसोटी सामना १५ जानेवारीपासून ब्रिस्बेनच्या मैदानावर खेळवला जाईल.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! विराट कोहली बनला बापमाणुस; अनुष्काने दिला गोंडस मुलीला जन्म
त्याला पाठीच्या दुखापतीने भयंकर वेदना होत होत्या, अश्विनच्या पत्नीने केला खुलासा
शब्बास रे पठ्ठ्यांनो!! ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना अनिर्णित झाल्यावर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव