इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय संघ १ जूलैपासून कसोटी सामना खेळणार आहे. कोरोना विषाणूमुळे २०२१मध्ये ही कसोटी रद्द करण्यात आली होती. सध्या भारत मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीनेही हा सामना खूप महत्त्वाचा आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील हा सामना एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारताचे नेतृत्व जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता अधिक आहे. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांपुढे खूप मोठे आव्हान आहे. त्याचबरोबर संघाची काय व्यूहरचना असेल हे पाहुया.
इंग्लंडने नुकतेच घरच्या मैदानावर कसोटी चॅम्पियन न्यूझीलंड संघाचा पराभव केला आहे. त्यांनी तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली ३-० असा मोठा विजय मिळवला असल्याने त्यांचे मनोबल उंचावले आहे. अशातच भारतीय संघाला अचूक विचारशक्तीने सामोरे जावे लागणार आहे. त्यातच संघाच्या फलंदाजीचा महत्वपूर्ण दुवा विराट कोहली याच्या वाईट फॉर्मची चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे भारताच्या अन्य फलंदाज आणि गोलंदाजांवरची जबाबदारी वाढणार आहे.
इंग्लंडचे स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो हे खतरनाक लयीत आहे. त्यांनी न्यूझीलंड आणि नेदरलॅंड्स विरुद्ध धावांचा रतीब घातला आहे. यामुळे त्यांना शक्य तितक्या लवकर बाद करण्याचे लक्ष्य भारतीय गोलंदाजांपुढे असणार आहे.
ही मालिका मागील वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुरू झाली होती. या मालिकेत झालेल्या चार सामन्यांमध्ये बुमराहने भारताकडून सर्वाधिक १८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आगामी कसोटी सामन्यातही सरस कामगिरी करावी अशी आशा आहे. या मालिकेत त्याच्यानंतर मोहम्मद सिराजने १४ विकेट्स घेतल्या आहेत.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने सिराजला संघात कायम ठेवण्याचे विधान केले आहे. त्याने म्हटले, “सिराज परदेशी भुमीवर झालेल्या मागील काही सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने इंग्लंडविरुद्धही उत्तम गोलंदाजी केल्याने त्याला संघाबाहेर ठेवण्याचे कोणतेच कारण नाही.”
“बुमराह आणि सिराज प्रमाणे मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकुर यांच्याही जागा संघात पक्क्या आहेत. सिराजने तिसऱ्या क्रमाकावर गोलंदाजी करावी,” असेही अजितने पुढे म्हटले आहे.
ओव्हल येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात बुमराहने इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना लवकर बाद केले होते. त्या सामन्यात उमेश यादवनेही तीन विकेट्स घेत फलंदाजांना त्रास दिला होता. हा सामना १५७ धावांनी जिंकला होता. हे सातत्या राखण्याचे भारतीय गोलंदाजांचे प्रयत्न असणार आहे.
ऍजबस्टन येथेच मैदानावर भारतीय संघाची बैठक झाली, जिथे सांगितले गेले की, रोहित शर्मा पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघाचा भाग नसेल आणि त्याच्याजागी बुमराह नेतृत्व करेल. रोहित लिसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान कोरोना संक्रमित झाला होता. त्यानंतर त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. बुधवारी आणखी एकदा त्याची कोरोना चाचणी केली जाणार होती. परंतु आता तो इंग्लंडविरुद्ध खेळणारच नसल्याचे समजत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नर्व्हस नायंटीजचा शिकार झाला असता हुड्डा; कसा वाचला सामन्यानंतर सांगितले मित्राला