भारतीय पुरुष क्रिकेट संघ सध्या मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध वनडे मालिका खेळण्यात व्यस्त आहे. यामधील झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला. मालिकेतील दोन सामने बाकी असताना पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या संघातील जागेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. त्यांची जागा घेणाऱ्या बदली खेळाडूंबद्दल चर्चा होणे स्वाभाविक, असे मत इंग्लंडचा माजी फिरकीपटूने मांडले आहे.
ग्रॅमी स्वानने म्हटले की, जेव्हा रोहित आणि विराटसारखे दिग्गज खेळाडू त्यांच्या कारकिर्दीच्या अखरेच्या टप्प्यात असतात, तेव्हा त्यांच्या बदली खेळाडूंबद्दल चर्चा होणे स्वाभाविक आहे. भारत जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून तेथे तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या पार्श्वभूमीवर स्वानने त्याचे मत व्यक्त केले.
“मला वाटते की, कोणत्याही खेळाडूच्या बाबतीत हे अटळ आहे. जेव्हा तुम्ही कारकिर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात येता, तेव्हा त्याने कितीही चांगला खेळ केला असला तरी, लोक त्याच्या उत्तराधिकाऱ्याच्या शोधात असतात,” असे स्वानने एका मुलाखतीत म्हटले आहे.
“ज्या क्षणी तुमचे एक-दोन गुण कमी होतात, त्या क्षणी सगळे तुमच्याकडे डोकावून पाहू लागतात की आता पुढचा क्रमांक कोणाता आहे. आणि अर्थातच वैभव सूर्यवंशी आणि काही युवा खेळाडूंच्या आगमनामुळे, बाकी खेळाडूंवर विशेषत: भारताच्या सलामीच्या फळीतील खेळाडूंवर अधिक जबाबदारी येते, असेही स्वानने पुढे म्हटले आहे. तसेच त्याने रोहितसाठी पुढील आठवडे महत्त्वाचे आहेत,” असाही विश्वास दर्शविला आहे.
“मला वाटते रोहितसाठी हे सहा आठवडे खूप महत्त्वाचे आहेत. तो आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आणि तो अजूनही सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे जर मी त्याच्याविरुद्ध खेळत असतो, तर मला नक्कीच गोलंदाजी करायला आवडले नसते,” असे स्वानने रोहितबद्दल म्हटले आहे. तसेच त्याने विराटच्या आयपीएल २०२६ मधील उल्लेखनीय कामगिरीचेही कौतुक केले.






