---Advertisement---

ENGvIND, 2nd Test , 4th Day: रहाणे-पुजाराच्या शतकी भागीदारीने भारताला सावरले; चौथ्या दिवसाखेर भारताकडे १५४ धावांची आघाडी

On: रविवार, ऑगस्ट 15, 2021 10:50 PM
Cheteshwar Pujara and Ajinkya Rahane
---Advertisement---

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सुरु असून रविवारी (१५ ऑगस्ट) सामन्याचा चौथा दिवस होता. चौथ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात ८२ षटकात ६ बाद १८१ धावा केल्या आहेत. तसेच १५४ धावांची आघाडी घेतली आहे. रिषभ पंत १४ धावांवर आणि इशांत शर्मा ४ धावांवर नाबाद आहेत.

रहाणेचे अर्धशतक

दुसरे सत्र पूर्ण खेळून काढल्यानंतर पुजारा आणि रहाणेने तिसऱ्या सत्रातही आपला उत्तम खेळ चालू ठेवला. त्यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना मोठे यश मिळू दिले नाही. या दोघांनी खराब चेंडूंवर चांगले फटके मारत भारताचा धावफलक सतत हलता राहिल, याची काळजी घेतली. दरम्यान, रहाणेने ६८ व्या षटकात त्याचे २४ वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले.

पुढेही या दोघांनी चांगला खेळ करत ७३ व्या षटकात शतकी भागीदारी पूर्ण केली. पण याच षटकात पुजाराला मार्क वूडने जो रुटकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे पुजारा २०६ चेंडूत ४५ धावा करुन बाद झाला. त्याचे अर्धशतक केवळ ५ धावांनी हुकले. पुजारा आणि रहाणे यांच्यात १०० धावांची भागीदारी झाली. पुजारा बाद झाल्यानंतर रिषभ पंत फलंदाजीला आला.

रिषभ पंत आणि रहाणेची जोडी फार काळ टिकली नाही. रहाणे ७६ व्या षटकात मोईन अली विरुद्ध खेळताना यष्टीरक्षक जोस बटलरकडे झेल देऊन बाद झाला. त्याने १४६ चेंडूत ५ चौकारांसह ६१ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ ८० व्या षटकात रविंद्र जडेजाला मोईन अलीने ३ धावांवर त्रिफळाचीत केले.

अखेर दिवसाचा खेळ संपेपर्यंत पंतला इशांत शर्माने साथ दिली. ८२ व्या षटकानंतर कमी प्रकाराशाच्या कारणाने दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. खेळ थांबला तेव्हा भारताने ६ बाद १८१ धावा केल्या होत्या. पंत १४ धावांवर आणि इशांत ४ धावांवर नाबाद आहेत.

पुजारा-रहाणेने भारताला सावरले

या दिवशी पहिल्या सत्रात भारताने ३ महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. पण दुसऱ्या सत्रात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने भारताचा डाव सावरला. या दोघांनी दुसरे सत्र पूर्णपणे खेळून काढले. पुजाराने एका बाजूने सावध खेळ केला, तर दुसऱ्या बाजूने रहाणेनेही त्याला तोलामोलाची साथ दिली. त्यामुळे या दोघांनी दुसऱ्या सत्राखेरपर्यंत नाबाद अर्धशतकी भागीदारी केली.

भारतीय संघाने दुसऱ्या डावात दुसऱ्या सत्रापर्यंत ५३ षटकांत ३ बाद १०५ धावा केल्या असून ७८ धावांची आघाडी घेतली आहे. रहाणे २४ धावांवर आणि पुजारा २९ धावांवर नाबाद आहे.

पहिल्या सत्रात इंग्लंडचे वर्चस्व

या सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडचा पहिला डाव ३९१ धावांवर संपला होता. तसेच इंग्लंडने पहिल्या डावात २७ धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. भारताकडून सलामीला रोहित शर्मा आणि केएल राहुल उतरले. या दोघांनी खूप सावध सुरुवात केली होती. मात्र, अखेर १० व्या षटकात केएल राहुल मार्क वूडविरुद्ध खेळताना यष्टीरक्षक जोस बटलरकडे झेल देऊन बाद झाला. त्याने ३० चेंडूत ५ धावा केल्या.

तो बाद झाल्याने रोहितला साथ देण्यासाठी चेतेश्वर पुजारा मैदानात आला. पण ही जोडीही फार काळ टीकू शकली नाही. रोहित मार्क वूडने टाकलेल्या १२ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पुल शॉट मारण्याच्या प्रयत्नात डीप स्क्वेअर लीगला असलेल्या मोईन अलीकडे झेल देऊन बाद झाला. रोहितने ३६ चेंडूत २१ धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानात आला आहे.

विराट आणि पुजाराने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. विराटने काही चांगले फटकेही खेळले. मात्र, पुन्हा एकदा तो चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याला सॅम करनने डावाच्या २४ व्या षटकात यष्टीरक्षक जोस बटलरकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे विराट ४ चौकारांसह ३१ चेंडूत २० धावा करुन बाद झाला. त्याच्यानंतर अजिंक्य रहाणे मैदानावर आला असून आणि त्याला पुजारासह भारताच्या डावाची जबाबदारी घ्यावी लागणार आहे.

भारताने पहिल्या सत्रात दुसऱ्या डावात २५ षटकात ३ बाद ५६ धावा केल्या आहेत. पुजारा ३ धावांवर आणि रहाणे १ धावेवर नाबाद खेळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---