ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघातील पाच खेळाडूंना एकांतवासात ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी(१ जानेवारी) मेलबर्नमध्ये एका हॉटेलमध्ये जेवण करताना त्यांनी चाहत्याची भेट घेतल्याचे वृत्त समोर आल्याने त्यांना एकांतवासात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या चाहत्याने खेळाडूंच्या जेवणाचे बिल भरले होते, त्यामुळे खेळाडूंनी त्याची भेट घेतली होती. या भेटीचा खुलासा चाहत्याने ट्विटरवर केला होता.
एकांतवासात ठेवण्यात आलेल्या ५ खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, रिषभ पंत, शुबमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी यांचा समावेश आहे. तसेच त्यांना भारतीय आणि ऑस्ट्रेलियन संघापासून वेगळे करण्यात आले आहे. असे असले तरी त्यांना सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
भारतीय आणि ऑस्ट्रेलियन संघातील सर्व सदस्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कडक नियम केलेल आहेत, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच असेही सांगण्यात आले आहे की ‘बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया या प्रकरणाची चौकशी करत आहे. तसेच याचाही शोध घेत आहेत की जैव-सुरक्षित वातावरणाच्या नियमाचा भंग झाला आहे की नाही.’
याबरोबरच अशीही माहिती देण्यात आली आहे की ‘तात्काळ भारतीय आणि ऑस्ट्रेलियन वैद्यकीय पथकाच्या सल्यानुसार या खेळाडूंना सावधगिरी म्हणून वेगळे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय आणि ऑस्ट्रेलियन संघासह त्यांना प्रवास करता येणार नाही, तसेच प्रशिक्षणाच्या ठिकाणी जाता येणार नाही.’
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या जैव-सुरक्षित वातावरणाच्या नियमाप्रमाणे खेळाडूंना हॉटेलमधून बाहेर पडण्याची परवानगी होती, तसेच ठरवून दिलेल्या मेलबर्नच्या सीमा पार करण्याची मात्र परवानगी नव्हती. त्याप्रमाणे खेळाडूंनी परवानगी असलेल्या ठिकाणीच जेवण केले होते. मात्र ते यादरम्यान चाहत्याला भेटले. त्यामुळे कदाचीत जैव -सुरक्षित वातावरणाच्या नियमाचा भंग झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण खेळाडूंना सोशल डिस्टसिंग न पाळता चाहत्यांना भेटण्याची परवानगी नाही.
नक्की काय आहे प्रकरण –
झाले असे की भारतीय संघातील रोहित शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत आणि नवदीप सैनी असे काही खेळाडू मेलबर्नमध्ये एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. दरम्यान त्याच ठिकाणी भारतीय संघाचा नवलदीप सिंग हा चाहताही आपल्या पत्नीसह आला होता. त्याला या क्रिकेटपटूंना पाहून इतका आनंद झाला की त्याने त्यांचे बिलही भरुन टाकले, तसेच नंतर क्रिकेटपटूंनी आग्रह करुनही बिलाचे पैसे त्याने घेतले नाही. त्यामुळे त्याचे प्रेम पाहून पंतने त्याला मिठी मारली, असा दावा या चाहत्याने ट्विटरवर केला होता.
मात्र त्याच्या या दाव्यामुळे जैव सुरक्षित वातावरणाच्या नियमाचा भंग झाला असल्याची शक्यता वर्तवली जात होती. पण त्यानंतर काहीवेळातच नवलदीपने पुन्हा ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे की ‘पंतने मला मिठी मारली नव्हती. मी जे बोललो ते उत्साहाच्या भरात होते. आम्ही आमच्या संवादांदरम्यान सोशल डिस्टसिंगचे सर्व नियम पाळले होते. गैरसमजाबद्दल मी माफी मागतो.’
Clarification – Pant never hugged me it was all said in excitement we maintained social distance all thru:) Apologies for miscommunication @BCCI @CricketAus @dailytelegraph
— Navaldeep Singh (@NavalGeekSingh) January 2, 2021
परंतु, जरी नवलदीपने स्पष्टीकरण दिले असले तरी बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणात लक्ष घातले आहे. त्यामुळे आता पुुढे या प्रकरणाबाबत काय निर्णय घेतला जातो हे पहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! आधी दुर्लक्षित केलेल्या अर्जून तेंडुलकरचा आता मुंबई संघात समावेश
नववर्षाचा शुभारंभ! ‘या’ क्रिकेटरने प्रेयसीसोबत केला साखरपुडा, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
“विसरू नका, ते दोघेही भारतीय आहेत”, ‘त्या’ दोन क्रिकेटर्सच्या तुलनेवर मास्टर ब्लास्टरचे भाष्य