महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर रंगलेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत मालिका २-१ ने आपल्या नावावर केली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ६६ धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाने ६ गडी राखून सामना जिंकला होता.
रविवारी पार पडलेला तिसरा आणि अंतिम वनडे सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता. या सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवत मालिकेवर आपले नाव कोरले आहे. येथे आम्ही ५ प्रमुख कारणे दिली आहेत, ज्यामुळे भारतीय संघाला अटीतटीच्या तिसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवण्यात यश आले.
१) पावरप्लेमध्ये गडी बाद करण्यात यश : भारतीय संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात ३३७ धावांचा डोंगर उभारला होता. तरीसुद्धा इंग्लंड संघाने एकहाती विजय मिळवला होता. भारतीय गोलंदाजांना पावरप्लेमध्ये गडी बाद करण्यात अपयश आले होते. त्यामुळे इंग्लंड संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. तिसऱ्या वनडे सामन्यात आव्हान ३३० धावांचे होते. परंतु भारतीय गोलंदाजांनी पहिल्या १० षटकातच इंग्लिश संघातील प्रमुख फलंदाजांना माघारी धाडले होते. त्यामुळे इंग्लिश संघाला चांगली सुरुवात मिळाली नाही आणि भारतीय संघाने हा सामना जिंकला.
२) हार्दिक पंड्याचा योग्य वेळी वापर : दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघातील फिरकी गोलंदाज कृणाल पंड्या आणि कुलदीप यादव यांनी जास्त धावा खर्च केल्या होत्या. तसेच त्यांना गडी बाद करण्यात देखील अपयश आले होते. या सामन्यात हार्दिक पंड्या संघात असताना देखील विराट कोहलीने ६ व्या गोलंदाजाचा वापर केला नव्हता. परंतु तिसऱ्या वनडे सामन्यात हार्दिक पंड्याने देखील गोलंदाजी केली. त्याने ४९ व्या षटकात अवघ्या ५ धावा दिल्या होत्या. तसेच तिसऱ्या सामन्यात कृणालला अवघे ४ षटक देण्यात आले होते.
३) विराट कोहलीने योग्यवेळी टिपला झेल : या सामन्यात भारतीय खेळाडूंनी ४ झेल सोडले. परंतु महत्वाच्या क्षणी कर्णधार विराट कोहलीने आदील राशिदचा झेल टिपत भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले.
४) भारतीय फलंदाजांची उल्लेखनीय कामगिरी : भारतीय संघातील फलंदाज गेल्या काही सामन्यांपासून चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. तिसऱ्या वनडे सामन्यात देखील त्यांनी पुन्हा एकदा ३०० पेक्षा अधिक धावा करण्याचा पल्ला गाठला. सुरुवात चांगली मिळाली असतानाही, १५७ धावांवर भारतीय संघाचे ४ गडी बाद झाले होते. परंतु त्यांनतर हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत यांच्या तुफान फटकेबाजी मुळे भारतीय संघाने ५० षटक अखेर ३२९ धावा केल्या.
५) तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने मारले सर्वाधिक षटकार : दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लिश फलंदाजांकडून तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली होती. इंग्लिश फलंदाजांनी २० षटकार लगावले होते. तर भारतीय संघाने १४ षटकार लगावले होते. परंतु तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने सर्वाधिक ११ षटकार लगावले आणि इंग्लिश संघाला ७ षटकार मारण्यात यश आले. त्यामुळे इंग्लिश संघाला ७ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘ठोकर खाकरही आदमी ठाकूर बनता है,’ भारतीय दिग्गजाकडून शार्दुलवर कौतुकाची थाप
जल्लोष असावा तर असा! इंग्लिश कर्णधार बाद होताच विराटने दिली ‘अशी’ रिऍक्शन, पाहा Video
शार्दुल ‘मॅन ऑफ द मॅच’ नसल्याचं ऐकून आश्चर्य वाटलं; भारतीय कर्णधाराने व्यक्त केला संताप





