नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत, भारतीय संघाने ३-२ ने विजय मिळवला. या मालिकेत युवा खेळाडूंना संधी देण्यात आली. तसेच संघाच्या फलंदाजी क्रमवारीत बदलदेखील पाहायला मिळाले. पहिल्या ४ टी-२० सामन्यात केएल राहुलने डावाची सुरुवात केली होती. परंतु त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे ५ व्या टी -२० सामन्यात त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. अशात सध्या खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या राहुलला समर्थन देत माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने मोठे वक्तव्य केले आहे.
पहिल्या चार टी-२० सामन्यात कर्णधार विराट कोहलीने राहुलला सलामी फलंदाजाची भूमिका दिली होती. परंतु त्याने या ४ सामन्यात अवघ्या १५ धावा केल्या. त्यामुळे ५ व्या टी-२० सामन्यात कोहली स्वतः सलामीला फलंदाजी करण्यासाठी आला होता.
अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू गंभीरने राहुलला समर्थन देत म्हटले आहे की, “कोणालाही संघातून वगळून आपण त्याची मदत करू शकत नाही. राहुलने इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेत खेळावे. जर कोणी चांगल्या फॉर्ममध्ये नसेल तर त्याला खेळण्याची संधी उपलब्ध करून दिल्यास तो खेळाडू पुन्हा फॉर्ममध्ये येऊ शकतो.”
तसेच तो पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्ही बेंचवर बसून असता, तो अनुभव चांगला नसतो. कारण तुम्हाला माहीत असते की तुम्हाला संघाबाहेर केले गेले आहे.”
भारतीय संघ पाचव्या टी-२० सामन्यात ६ गोलंदाजांसह मैदानात उतरला होता. या निर्णयावर सहमत होऊन गंभीर म्हणाला की, “भारतीय संघ ६ गोलंदाजांसह मैदानात उतरला. मी या निर्णयाशी सहमत आहे. कारण भारतीय संघात नेहमीच गोलंदाजांची कमतरता जाणवते. यावर एकच उपाय होता, केएल राहुलला बाहेर काढून एका गोलंदाजाला संघात संधी देण्यात यावी. हीच रणनिती भारतीय संघाने अंमलात आणली. परंतु त्यांनी वनडे मालिकेत राहुलला आणखी एक संधी द्यायला हवी.”
वनडे मालिकेचे वेळापत्रक
भारत-इंग्लंड वनडे मालिकेची सुरुवात २३ मार्चपासून होणार आहे. त्यानंतर २६ मार्च रोजी दुसरा आणि २८ मार्च रोजी तिसरा व शेवटचा वनडे सामना होणार आहे. हे सर्व सामने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे खेळवले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अनुष्काच्या कुशीत लाडकी लेक अन् विराटच्या हाती सामानाचं ओझं, पाहा पुणे विमनातळावरील फोटो
वनडेत इंग्लंडविरुद्ध ‘या’ भारतीय दिग्गजाने घातलाय धावांचा रतीब, विराट-रोहित आहेत खूपच दूर
एकीकडे विजयाचा जल्लोष तर दुसरीकडे शिक्षा; ‘या’ कारणामुळे आयसीसीने भारतावर ठोठावला दंड