टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्याची जितकी चाहते वाट पाहत आहेत, तितकीच वाट भारतीय कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्यातील संघर्षाची देखील पाहत आहेत.
‘अँडरसन विरुद्ध कोहली’ ही लढत भारताच्या मागील दोन इंग्लंड दौऱ्यांतील मुख्य आकर्षण ठरली होती. 2014 मध्ये अँडरसनने विराटला त्याच्या स्विंग आणि वेगाने अनेक वेळा बाद केले होते. विराटसाठी ही मालिका त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट मालिका ठरली.
विराटने पुढच्या दौऱ्यात आपल्या खेळात असा बदल केला की संपूर्ण जगाने त्याला सलाम केला. दोन्ही देशांमधील मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रीम स्वान याने या दोन महान खेळाडूंमध्ये या वेळी कोण जिंकेल, याचा अंदाज वर्तवला आहे.
स्वानने वर्तविला असा अंदाज
एका प्रसिद्ध क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना माजी स्वान म्हणाला, “2014 मध्ये विराटसोबत जे घडले, त्यानंतर 2018 मध्ये तो तयारीने आला आणि अँडरसनला आपल्यावर वर्चस्व गाजवू दिले नाही. मला वाटते पुन्हा एकदा विराट चांगली तयारी करून आला असावा, कारण त्याला माहित आहे की, इंग्लंडच्या खेळपट्टीवर अँडरसन किती प्रमाणात धोकादायक ठरू शकतो. विराट इंग्लिश गोलंदाजांचे व्हिडिओ पाहत असावा आणि त्यांचा सामना कसा करायचा याची तयारी करत असणार.”
विराटचे केले कौतुक
विराटने एक वर्षापेक्षा जास्त काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकले नाही आणि क्रिकेट जगतात हा चर्चेचा मुद्दा बनला आहे. यावर स्वान म्हणला, “शतक नाही म्हणजे विराट लयीत नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. त्याने इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन अर्धशतके झळकावली, तर न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात पूर्ण नियंत्रणात महत्त्वपूर्ण 44 धावांची खेळी केली. त्याच्या महानतेवर कोणी शंका घेत असेल तर, इंग्लंड दौऱ्यानंतर त्यांना याचे उत्तर मिळून जाईल.”
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला ४ ऑगस्टपासून नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर सुरुवात होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंकेत दमदार कामगिरी करत ‘या’ युवा भारतीय खेळाडूंनी ठोकली टी२० विश्वचषकासाठी दावेदारी
सुवर्णपदक विसरा! सेमीफायनलमध्ये सिंधू सरळ सेटमध्ये पराभूत; आता लक्ष्य कांस्य पदक
जागतिक अव्वल क्रमांकाच्या बॉक्सरकडून पूजा राणीचा एकतर्फी पराभव; ऑलिंपिक्स २०२०मधून पडली बाहेर