आयपीएल 2023चा 43 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने जिंकला. लखनऊ सुपरजायंट्सला त्यांच्या घरच्या मैदानावर 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली, लखनऊचा युवा वेगवान गोलंदाज नवीन उल हक व लखनऊचा मेंटर गौतम गंभीर हे या वादाच्या केंद्रस्थानी होते. त्या वादावर अनेक माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली. भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने गंभीर व कोहली यांना या प्रकरणावर सल्ला देखील दिला आहे.
लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने 127 धावांचा बचाव करत दमदार विजय मिळवला. मात्र सामन्या दरम्यान आरसीबीचा कर्णधार विराट कोहली व लखनऊचा युवा वेगवान गोलंदाज नवीन उल हक यांच्या दरम्यान शाब्दिक युद्ध रंगले होते. सामना संपल्यानंतर हातमिळवणी करताना देखील या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर लखनऊचा मेंटर गौतम गंभीर याने या वादात उडी घेत विराटला बोल लावले. त्यानंतर हे प्रकरण चिघळल्याने दोन्ही खेळाडू एकमेकांच्या अंगावर गेले. अनेकांनी यावर तिखट प्रतिक्रिया देत हे व्यावसायिक खेळाडूंना शोभणारे वर्तन नसल्याचे म्हटले.
याबाबत आपल्या युट्युब चॅनलवर बोलताना हरभजन सिंग म्हणाला,
“गंभीर आणि विराट यांच्या दरम्यान जे काही झाले ते क्रिकेटसाठी योग्य नाही. अशा गोष्टी क्रिकेटपटूंचे नुकसान करणाऱ्या असतात. या प्रकरणात खेळाडूची प्रतिमा खराब होते जी सुधारायला संपूर्ण कारकीर्द जाते. श्रीशांत आणि माझ्यात जे काही झाले होते त्याबद्दल मला आजही शरम वाटते.”
हरभजन आणि श्रीशांत यांच्या दरम्यान आयपीएल 2008 वेळी मोठा वाद झाला होता. मुंबईचे नेतृत्व करत असलेल्या हरभजनने त्यावेळी पंजाबसाठी खेळणाऱ्या श्रीशांतच्या श्रीमुखात भडकवली होती. त्यानंतर त्याला तीन सामन्यातून निलंबित केले गेलेले.
(Harbhajan Singh Advice To Virat Kohli And Gautam Gambhir After Fight)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लखनऊच्या चाहत्यांना विराटने केले आपलेसे! सामन्यानंतर केलेले ट्विट चर्चेत
‘यशस्वी भारतीय क्रिकेटचे भविष्य’, संगकाराकडून जयस्वालचे तोंडभरून कौतुक