आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. तसेच संघ गुणतालिकेत देखील तळाच्या 10 व्या स्थानावर राहिला. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रँचायझी असलेल्या मुंबई इंडियन्सची ही अवस्था पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
मुंबई इंडियन्सनं आयपीएल 2024 साठी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले होतं. आता संघाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग म्हणाला की, मुंबई इंडियन्स संघाच्या या स्थितीला संघातील वरिष्ठ खेळाडू जबाबदार आहेत. हरभजन सिंगनं रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव किंवा अन्य कोणाचंही नाव घेतलं नाही, मात्र या हंगामात वरिष्ठ खेळाडू संघाला एकत्र ठेवू शकले नाहीत, असं तो म्हणाला.
हरभजन सिंगला जेव्हा मुंबई इंडियन्सच्या खराब स्थितीबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, “मुंबई इंडियन्स ही खूप मोठी टीम आहे. मी त्या फ्रँचायझीसाठी 10 वर्ष खेळलो. तिथलं मॅनेजमेंट खूप चांगलं आहे. तिथं प्रत्येक गोष्ट सुरळीतपणे चालवली जाते. मात्र हा जो काही निर्णय घेतला गेला, तो त्यांच्यावरच उलटला. मला वाटतं की हा निर्णय भविष्यासाठी घेतला गेला आहे अशी भावना होती. परंतु तो संघाला मान्य झाला नाही. मी जेव्हा मुंबईला खेळताना पाहत होतो, तेव्हा थोडं वेगळं वाटत होतं. कर्णधार वेगळा अन् संघ वेगळा. संघ विखुरलेला असेल तर अशीच परिस्थिती होणार होती.”
या सगळ्यात हार्दिक पांड्याचा कोणताही दोष नाही, असं हरभजन सिंगचं मत आहे. भज्जी पुढे म्हणाला, “एवढ्या मोठ्या संघाला अशा प्रकारे खाली जाताना पाहून मला वाईट वाटतं. त्यामुळे जो निर्णय घेण्यात आला, त्याची वेळ योग्य नव्हती असं मला माझं मत आहे. हा निर्णय वर्षभरानंतर घेतला असता तर बरं झालं असतं. कारण हार्दिक पांड्या तिथे (गुजरात टायटन्स) चांगली कामगिरी करत होता. तो तिथेही कर्णधार होता. त्यामुळे यात हार्दिकचा दोष नाही. येथे जबाबदारी काही वरिष्ठ खेळाडूंवर येते. कर्णधार कोणीही असो, संघ आधी येतो. तुम्ही आधी संघाचा विचार करा. कर्णधार येतील, कर्णधार जातील, पण संघ कायम राहत असतो.”
महत्त्वाच्या बातम्या –
हरभजन सिंग बनणार टीम इंडियाचा नवा हेड कोच? बीसीसीआयकडून मिळाली मोठी ऑफर!
गौतम गंभीरचा निवडकर्त्यांवर मोठा आरोप; म्हणाला, “मी पाया पडायचो नाही म्हणून…”
रोहित शर्माच्या आरोपांना ‘स्टार स्पोर्ट्स’नं दिलं उत्तर, निवेदन जारी करत म्हणाले…