भारताचा महान फिरकीपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) २४ डिसेंबर रोजी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. दिग्गज भारतीय फिरकीपटूंपैकी एक असणाऱ्या हरभजनने त्याच्या २३ वर्षाच्या कारकीर्दीत भारताला बरेच सामने जिंकवून दिले. त्याने खेळलेल्या ३६७ आंतरराष्ट्रीय सामन्यात ७११ विकेट्स घेतल्या.
हरभजन २००७ विश्वचषक आणि २०११ विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. त्यावेळी संघाचा कर्णधार एमएस धोनी (Mahendra Singh Dhoni) होता. परंतु, हरभजनला घडवण्याचे काम खरेतर सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) केले आहे. गांगुलीच्या कर्णधारपदात २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३२ विकेट्स घेऊन त्याने धुमाकूळ घातला होता. यादरम्यानच तो कसोटीमध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनलेला.
हरभजनने एका वृत्तसंस्थेशी गांगुली आणि धोनीबद्दल बोलताना म्हणाला, “हे सांगणं खूपच सोपं आहे. गांगुलीने मला माझी काहीच ओळख नसताना पाठिंबा दिला. जेव्हा धोनी कर्णधार बनला तेव्हा मी माझी ओळख बनवली होती. त्यामुळे तुम्हाला यातील अंतर समजलेच असेल. दादाला माहिती होतं की माझ्याकडे कौशल्य आहेत पण मला स्वतःवर आत्मविश्वास नव्हता. धोनीबद्दल म्हणाल तर, त्याला माहिती होतं की मी याआधीही चांगलं प्रदर्शन केलंय आणि पुढे ही करू शकतो.”
हरभजनने सौरव गांगुलीचे कौतुक करताना म्हटले, “आयुष्याच्या एका क्षणी एका माणसाची गरज असते जो आपल्याला मार्गदर्शन करू शकेल, तो माणूस माझ्यासाठी सौरव गांगुली होता. सौरवने माझ्यासाठी लढून मला संघात घेतले नसते तर, मला कोणी ओळखलं नसते. तुम्ही सुद्धा आज माझ्यासोबत ही मुलाखत नसती घेतली. सौरवने मला मी जसा आहे तसं घडवलं आहे.”
हरभजन धोनीचं कौतुक करताना म्हणाला, “धोनी खरेच एक उत्कृष्ट कर्णधार होता. त्याने सौरवची वाटचाल पुढे तशीच ठेवली आणि आम्ही एकत्र जे काही सामने जिंकलो ते मी नेहमी आठवणीत ठेवीन.”
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सचा पहिला कर्णधार राहिलाय हरभजन, वाचा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील ३ रोमांचक तथ्ये
एकीचे बळ! जेव्हा हरभजनवर आलेली बंदी, तेव्हा भारतीय संघाने दाखवलेला खंबीर पाठींबा, वाचा तो किस्सा
हरभजनच्या निवृत्तीनंतर पत्नीची भावनिक पोस्ट; म्हणाली, ‘त्याला अशी निवृत्ती नको होती, पण..’