टी२० विश्वचषकात रविवारी (३१ ऑक्टोबर) दोन बलाढ्य संघांमध्ये महत्वाचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड या संघांचे एकमेकांपुढे आव्हान होते. न्यूझीलंडने या सामन्यात भारतीय संघाचा ८ विकेट्स राखून दारुण पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीला न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने घेतलेला हा निर्णय अगदी योग्य ठरला. कारण भारतीय संघाला या सामन्यात मोठी धावसंख्या करता आली नाही. भारताने प्रथम फलंदाजी करत अवघ्या ११० धावा केल्या होत्या. दरम्यान, भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने या सामन्यात त्याच्या नावावर एका नव्या विक्रमाची नोंद केली.
हार्दिक पंड्याने या सामन्यात २४ चेंडूत २३ धावांची खेळी केली आणि त्याने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ५०० धावांचा टप्पा पार केला. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५०० पेक्षा जास्त धावा आणि २५ विकेट्स पूर्ण करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगने हा विक्रम केला होता. युवराजने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत ११७७ धावा केल्या आहेत आणि २८ विकेट्स घेतल्या आहेत. हार्दिक पांड्या आता या यादीतील दुसरा खेळाडू ठरला आहे.
दरम्यान, या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना सात विकेट्सच्या नुकसानावर न्यूझीलंडपुढे १११ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने हे लक्ष्य अवघ्या १४.३ षटकांमध्ये गाठले आणि सामन्यात विजय मिळवला.
न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलने ३५ चेंडूत सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. यामध्ये त्याच्या चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. याव्यतिरिक्त भारतासाठी रवींद्र जडेजाने १९ चेंडूत सर्वाधित २६ धावा केल्या. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने चार षटकांमध्ये २० धावा दिल्या आणि भारताच्या तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
अरेरे! टी२० विश्वचषकाचा पहिलाच सामना खेळताना ईशान किशनचा नकोशा विक्रमाच्या यादीत समावेश
प्रथम फलंदाजी भोवली! टीम इंडियाच्या बाबतीत टी२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडली ‘अशी’ गोष्ट
आसिफच्या आयुष्यातील सर्वात दु:खद घटना; २ वर्षाच्या लाडक्या लेकीचा झाला होता कँसरने मृत्यू, आजही…





