भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेचं (Ajinkya Rahane) असं मत आहे की, जर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) चौथ्या कसोटी सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली, तर अर्शदीप सिंगला (Arshdeep singh) कसोटी सामन्यात पदार्पणाची संधी द्यायला हवी. सध्या इंग्लंड 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. जसप्रीत बुमराहच्या वर्कलोडला लक्षात घेता, त्याला इंग्लंड दौऱ्यात फक्त तीनच कसोटी सामने खेळवण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे गिल व गंभीरने दौऱ्यापूर्वी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं. बुमराहने लीड्स आणि लंडनमध्ये सामने खेळले आहेत, त्यामुळे ओल्ड ट्रॅफर्ड कसोटी सामन्यात त्याचा सहभाग अनिश्चित आहे.
रहाणेने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितलं की, जर बुमराह खेळत नसेल, तर अर्शदीप हा उत्तम पर्याय ठरेल, कारण इंग्लंडमध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज हवा असतो जो चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करू शकतो. शिवाय त्याच्या अँगलमुळे फिरकीपटूंना रफ तयार व्हायला मदत होते. म्हणून बुमराह खेळला नाही, तर अर्शदीपला संधी द्यायला हवी.
अर्शदीपने अजून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं नाही. पण त्याने 21 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 66 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी बेकनहॅममधील सराव सत्रात तो जखमी झाला. भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रयान टेन डोशेट यांनी सांगितलं की, चेंडू अडवताना अर्शदीप जखमी झाला. गोलंदाजी करताना चेंडू थांबवायचा प्रयत्न केला आणि त्यावेळी त्याला काप लागला. आता तो किती गंभीर आहे हे पाहावं लागेल.
या इंग्लंड दौऱ्यावर बुमराहने जबरदस्त कामगिरी केली आहे. फक्त दोन कसोटी सामन्यांतच त्याने 12 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये दोन वेळा एका डावात पाच विकेट्स घेण्याचं कौशल्यही त्याने दाखवलं. पण त्याचा वर्कलोड कमी ठेवण्यासाठी आणि पाठदुखी वाढू नये म्हणून संघ व्यवस्थापन आणि वैद्यकीय पथकाने आधीच निर्णय घेतला होता की तो फक्त तीन कसोटी सामने खेळेल. पण आता भारत मालिकेत पिछाडीवर असल्याने, व्यवस्थापन पुन्हा विचार करू शकतं आणि मालिका बरोबरीत आणण्यासाठी बुमराहला मॅंचेस्टर कसोटी सामन्यात खेळवलं जाऊ शकतं.





