---Advertisement---

पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावे, टीम इंडिया 185 धावांवर सर्वबाद; शेवटच्या चेंडूवर भारताचे पुनरागमन

On: शुक्रवार, जानेवारी 3, 2025 1:01 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळली जात आहे. ज्याचा पहिला दिवस संपला आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघाकडून रोमांचक स्पर्धा पाहायला मिळाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेली टीम इंडिया 185 धावांत गारद झाली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियानेही 9 धावांत 1 गडी गमावला. उस्मान ख्वाजाच्या विकेटपूर्वी जसप्रीत बुमराह आणि सॅम कॉन्स्टन्स यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यामुळे ख्वाजाला शेवटच्या चेंडूवर विकेट गमावून त्याचा फटका सहन करावा लागला.

या सामन्यात टीम इंडियाने नियमित कर्णधार रोहित शर्माला वगळण्याचा निर्णय घेतला होता. रोहितच्या जागी शुबमन गिलला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्यात आले. गिलला फार काही करता आले नाही तरी. त्याने 2 चौकारांच्या मदतीने केवळ 20 धावा केल्या. या सामन्यात जसप्रीत बुमराह भारताचे नेतृत्व करत आहे.

भारतीय संघाच्या फलंदाजांकडून पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्या सत्रातच टीम इंडियाची टॉप ऑर्डर कोलमडून पॅव्हेलियनमध्ये परतली. सलामीला आलेल्या केएल राहुल यशस्वी जयस्वाल यांना काही विशेष करता आले नाही. यानंतर विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी 40 धावांची भागिदारी केली मात्र लंचब्रेकपूर्वी गिलच्या रुपाने संघाला तिसरा धक्का बसला.

आघाडीची फळी पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर कोणताही खेळाडू संघाला स्थैर्य प्रदान करू शकला नाही. संघाला चौथा धक्का 72 धावांच्या स्कोअरवर विराट कोहलीच्या रूपाने बसला. 17 धावांची इनिंग खेळून कोहली पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर 120 धावांवर रिषभ पंतची पाचवी विकेट पडली. पंतने 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 40 धावा केल्या. त्यानंतर पुढच्या चेंडूवर नितीश रेड्डी गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर संघाने झटपट विकेट गमावल्या. मात्र खालच्या फळीत कर्णधार जसप्रीत बुमराहाने निर्णायक 22 धावा केल्या, ज्यामुळे संघ 185 धावसंख्येपर्यंत पोहचू शकला. भारताकडून रिषभ पंतने सर्वाधिक 40 धावा केल्या. गोलंंदाजीत ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने सर्वाधिक 4 बळी घेतले.

दिवसाचा खेळ संपण्याच्या काही वेळापूर्वीच टीम इंडिया ऑलआऊट झाली. यानंतर ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरला. उस्मान ख्वाजा आणि सॅम कॉन्स्टन्स डावाची सुरुवात केली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर कॉन्स्टन्सने बुमराहवर चौकार ठोकला. त्यानंतर डावाचे तिसरे षटक आणणाऱ्या बुमराह आणि कॉन्स्टन्समध्ये काही वाद झाला. 4 चेंडू टाकल्यानंतर हा वाद झाला. आता दिवसअखेर आणखी फक्त 2 चेंडू टाकायचे होते. बुमराहने दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर ख्वाजाला बाद करून टीम इंडियाचे काही प्रमाणात पुनरागमन केले. ख्वाजा 02 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

हेही वाचा-

रोहित शर्माला ड्रॉप करण्यावर जसप्रीत बुमराहची प्रतिक्रिया; म्हणाला, “संघाच्या हितासाठी….”
“त्याने आपला शेवटचा …”, रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीबद्दल दिग्गजाचा मोठा दावा
दुधातील माशी प्रमाणे रोहितला बाहेर काढले, यादीत राखीव खेळाडू म्हणूनही नाव नाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---