सध्या भारतीय क्रिकेट संघात कोणतीही जागा निश्चित नाही. चांगली कामगिरी करणाऱ्यालाच संधी मिळत असून, अपयशी ठरणाऱ्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो आहे. अशा परिस्थितीत या इंग्लंड दाैऱ्यावर अष्टपैलू रवींद्र जडेजावरही दबाव वाढलेला दिसतो आहे.
जडेजाने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात 41 धावा करून फॉर्ममध्ये परतण्याची आशा जागवली आहे. तो सध्या नाबाद असून, दुसऱ्या दिवसाच्या खेळात अर्धशतक सहज गाठू शकतो. मात्र, सध्याच्या परिस्थितीत केवळ अर्धशतक पुरेसं नाही, तर मोठी खेळी आवश्यक आहे.
जडेजाचा अर्धशतकाचा दुष्काळ बऱ्याच काळापासून सुरू आहे. त्याने शेवटचं अर्धशतक ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेनमध्ये 77 धावांच्या स्वरूपात केलं होतं. त्यानंतर त्याच्या बॅटमधून केवळ छोट्या छोट्या खेळीच आल्या आहेत.
या मालिकेतील पहिल्या कसोटीत जडेजाची कामगिरी निराशाजनक ठरली होती. पहिल्या डावात 11 आणि दुसऱ्या डावात नाबाद 25 धावा करत त्याने निराशा केली. गोलंदाजीतही त्याला फारसं यश मिळालं नाही. एका डावात 68 धावा देऊन एकही विकेट न मिळवता, दुसऱ्या डावात 104 धावा देऊन केवळ एकच बळी मिळवता आला.
रवींद्र जडेजाला संघात संधी मिळते, कारण तो एक अष्टपैलू खेळाडू आहे. म्हणजेच तो बॅट आणि बॉल दोन्ही बाजूंनी योगदान देतो. पण सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात फक्त नावावर संधी मिळत नाही. योगदान देणं गरजेचं आहे.
बर्मिंघमचा सामना जडेजासाठी निर्णायक ठरणार आहे. जर त्याने फलंदाजीसह गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली, तर त्याचे स्थान सावरू शकते. अन्यथा, संघ व्यवस्थापन त्याच्याबाबत कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.






