तेंडूलकर-अँडरसन कसोटी मालिकेत भारताने इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन कसोटी सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता तिसरा कसोटी सामना आजपासून लाॅड्स येथे खेळला जाणार आहे. दरम्यान भारताचा उपकर्णधार रिषभ पंत म्हणाला आहे की, लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडने खेळपट्टीच्या रणनीतीत बदल केल्याबद्दल टीम इंडियाला काळजी नाही. त्याने स्पष्ट केले की भारतीय संघाचे लक्ष विरोधी संघाच्या योजनांवर नाही तर परिस्थितीनुसार खेळण्यावर आहे. हेडिंग्ले आणि एजबॅस्टनसारख्या सपाट खेळपट्ट्यांवर भारताने दमदार कामगिरी केली आहे, जिथे भारताने एजबॅस्टन कसोटीत दोन्ही डावात 1000 पेक्षा जास्त धावा केल्या आणि गोलंदाजांनी 20 विकेट्स घेऊन ऐतिहासिक 336 धावांचा विजय नोंदवला.
लॉर्ड्स कसोटीपूर्वी पत्रकार परिषदेत पंत म्हणाला, ‘पाहा, आमच्या संघाची परिस्थितीनुसार खेळण्याची योजना आहे. आम्ही विरोधक काय करत आहेत, ते त्यांची योजना बदलत आहेत की नाही याचा विचार करत नाही. जे काही घडत आहे, आम्ही त्यात आमचे सर्वोत्तम देऊ आणि तिथून चांगले करण्याचा प्रयत्न करू.’
पुढे पंत म्हणाला, “इंग्लंडकडून फलंदाजीस पोषक खेळपट्ट्या मिळणार, याची आम्हाला कल्पना होती कारण त्यांची खेळण्याची शैली तशी आहे. त्यामुळे आम्ही आधीच ठरवलं होतं की अशा खेळपट्ट्यांवरसुद्धा आम्हाला 20 बळी घ्यायचेच. ही आमची ठाम योजना होती.”
लॉर्ड्स कसोटीत जसप्रीत बुमराहचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे. जेव्हा पंतला बुमराहच्या खासियतीबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो हसला आणि म्हणाला, “त्याची अचूकता, विचार करण्याची पद्धत. तो खरोखरच अद्भुत आहे. जेव्हा तो इंग्लंडमध्ये गोलंदाजी करतो तेव्हा फलंदाजापेक्षा यष्टीरक्षकासाठी ते अधिक कठीण होते. मी हे अनुभवावरून सांगत आहे.”






