बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत असलेला इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) कसोटी सामना १ जुलैपासून खेळला जाणार आहे. हा सामना एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी केएल राहुल संघात उपस्थित नाही, तर नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे, अशा या बाबींमुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. त्यातच विराट कोहली (Virat Kohli)च्या खराब फॉर्ममुळे संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावर भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी त्याने शतक नाही केले तरी चालेल असे आश्चर्यकारक विधान केले आहे.
विराटच्या कामगिरीवरून माजी क्रिकेटपटूंनी आपापली मत मतांतरे व्यक्त केली आहेत. त्यातील काहींनी त्याने शतक केले पाहिजे अशी विधाने केली आहेत. यावर उलट द्रविड यांनी त्याने शतक करण्याची आवश्यकता नाही, तर त्याने सामनाविजयी खेळी केली पाहिजे, असे म्हटले आहे.
“कसोटीमध्ये २७ शतके ठोकणाऱ्या विराटमध्ये कोणत्याही गुणवत्तेची कमतरता नाही'” असे म्हणत द्रविड यांनी त्याची पाठराखण केली आहे. त्याने १०१ कसोटी सामने खेळले आहेत. विराटने २०१९नंतर एकही शतक केले नाही. त्याची आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) २०२२च्या हंगामातील कामगिरीही निराशाजनक राहिली होती.
द्रविड म्हणाले, “फलंदाजांनी नेहमी शतके केली पाहिजे या गोष्टीवर जोर देऊ नये. विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन येथे झालेल्या कसोटीमध्ये ७९ केेलेल्या धावा महत्वाच्या होत्या. या सामन्यात त्याचे शतक झाले नाही पण ती एक अप्रतिम खेळी होती. त्याने क्रिकटमध्ये स्वत:चा स्तर इतका उंच केला आहे ज्यामुळे त्याच्याकडून नेहमीच शतकाची अपेक्षा केली जाते. मात्र एका प्रशिक्षकाच्या दृष्टीने पाहिले असता त्याने सामनाविजयी खेळी करताना ४० किंवा ५० धावा केल्या असल्या तरी उत्तमच आहे.”
विराटला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. आता तो थेट इंग्लंडमध्ये खेळणार असल्याने त्याची फलंदाजीची लय कधी परत येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
या सामन्यात केएल राहुल दुखापतग्रस्त असल्याने तो खेळणार नाही, तर नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. यामुळे भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहे. त्यातच इंग्लंडच्या संघाने घरच्या मैदानावर प्रतिभावान कामगिरी करत कसोटी चॅम्पियन न्यूझीलंडला आयसीसी जागतिक अजिंक्यपद २०२१-२३च्या शर्यतीतून बाहेर केले आहे. त्यांचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याने आम्ही भारताविरुद्ध अशीच कामगिरी करणार असून आमचा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे असे स्पष्ट केले आहे.
तब्बल ५५ वर्षापासून भारतासाठी एजबस्टनवर सामना जिंकण्याची प्रतिक्षाच करावी लागली आहे. ती आता संपणार का याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. हा मागील वर्षी खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील पाचवा सामना असून भारत मालिकेत २-१ने आघाडीवर आहे. मालिका बरोबरी करण्याचा यजमान संघाचा तर भारताचा सामना जिंकण्याचा किंवा अनिर्णीत करण्याचा प्रयत्न असणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ENGvsIND: इंग्लंडच्या फलंदाजाविरोधात बुमराह ऍण्ड कंपनीची काय असेल रणनीती? वाचा सविस्तर
नर्व्हस नायंटीजचा शिकार झाला असता हुड्डा; कसा वाचला सामन्यानंतर सांगितले मित्राला
सनथ जयसूर्यासाठी वाढदिवस आहे खास, ‘या’ विक्रमाच्या यादीत मिळवलाय अव्वल क्रमांक