टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज आणि कसोटी संघाचा उपकर्णधार रिषभ पंतने ओव्हल कसोटीनंतर भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली असून, एका क्षणी गमावलेली मालिका अखेर पंत आणि मोहम्मद सिराजसारख्या खेळाडूंच्या जिगरबाज कामगिरीमुळे वाचवली.
पंतने चौथ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी झालेल्या दुखापतीचे छायाचित्र एक्स (X) वर शेअर करत लिहिले,
“हा दौरा आमच्याकडून खूप काही मागून गेला, पण त्याने आम्हाला त्याहून अधिक दिलं. आमच्या संघाने प्रत्येक आव्हान स्वीकारलं, परिस्थितीनुसार स्वतःला ढाळलं आणि सतत लढत राहिला. देशाचं प्रतिनिधित्व करणं आमच्यासाठी सर्वकाही आहे आणि त्यासाठी आम्ही आमची संपूर्ण ताकद झोकून देतो. आमच्या सपोर्ट स्टाफचे आणि सतत साथ देणाऱ्या चाहत्यांचे मनापासून आभार. हा संघ भुकेला आहे, एकजुट आहे आणि भारतीय क्रिकेट पुढे नेण्यासाठी तयार आहे.”
A tour that asked a lot and gave even more in return. Proud of how this team stood up, adapted and kept fighting. Representing the country means everything to us, it takes everything out of you but we take pride in that. Big thanks to our incredible support staff and the fans who… pic.twitter.com/dcLIrRzTXu
— Rishabh Pant (@RishabhPant17) August 4, 2025
शेअर केलेल्या छायाचित्रात पंतच्या उजव्या पायाच्या छोट्या बोटाजवळ टेपिंग आणि पट्टी बांधलेली दिसत आहे. ह्याच बोटाजवळ फ्रॅक्चर असूनही त्याने फलंदाजी केली. पंतच्या धाडसाची आणि लढाऊ वृत्तीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
या ऐतिहासिक दौऱ्यात पंतने 4 सामन्यांच्या 7 डावांत तब्बल 479 धावा ठोकल्या, ज्यात 2 भव्य शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या या जबरदस्त कामगिरीमुळे भारताने गमावलेली मालिका बरोबरीत आणत भारतीय चाहत्यांना मोठा आनंद दिला.






