---Advertisement---

कर्णधार-उपकर्णधाराच्या जोडीची कमाल! विराट-रोहितने पाचव्या टी२०मध्ये पाडला ७ षटकारांचा पाऊस, पाहा व्हिडिओ

On: रविवार, मार्च 21, 2021 11:20 AM
---Advertisement---

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघातील ५ सामन्यांची टी२० मालिका शनिवारी(२० मार्च) संपली. नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या मालिकेत भारताने ३-२ अशा फरकाने विजय मिळवला. शनिवारी पार पडलेल्या पाचवा आणि अखेरचा सामना भारताने ३६ धावांनी जिंकत ही मालिका खिशात घातली. पाचव्या सामन्यांतील भारताच्या विजयाचा भक्कम पाया संघाच्या कर्णधार आणि उपकर्णधाराने म्हणजेच विराट कोहली आणि रोहित शर्माने रचला. या दोघांनी चौकार आणि षटकारांची बरसात केली होती.

विराट रोहितची दमदार सलामी

पाचव्या सामन्यासाठी भारताने ज्यादाचा गोलंदाज खेळवयाचा या हेतूने केएल राहुलला अंतिम ११ जणांच्या संघातून बाहेर करत टी नटराजनला संधी दिली. त्यामुळे या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून रोहित शर्मासह विराट कोहलीने सलामीला फलंदाजी केली.

हे दोघे आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये पहिल्यांदाच एकत्र सलामीला फलंदाजी करत होते. पण असे असले तरी त्यांच्यातील सामंजस्य चांगले असल्याचे त्यांच्या भागीदारीवरुन दिसत होते. या दोघांनी सुरुवातीपासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. पॉवर प्लेच्या पहिल्या ६ षटकातच त्यांनी ६० धावा धावफलकावर लावल्या होत्या.

अखेर त्यांची ही भागीदारी बेन स्टोक्सने ९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्रिफळाचीत करत मोडली. या दोघांनी ९४ धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान दोघेही मध्ये मध्ये मस्तीच्या मूडमध्येही दिसून आले. तसेच एकमेकांच्या फटक्यांवर एकमेकांना प्रोत्साहन देतानाही दिसले. त्यांच्या भागीदारीदरम्यान त्यांनी मारलेल्या षटकारांचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या सामन्यात विराटने ५२ चेंडूत नाबाद ८० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने २ षटकार मारले. तर रोहितने ३४ चेंडूत ताबडतोड ६४ धावांची खेळी करताना तब्बल ५ षटकारांचा पाऊस पाडला.

विराट आणि रोहित यांच्या अर्धशतकांमुळे तसेच सुर्यकुमार यादव (३२) आणि हार्दिक पंड्या (३९*) यांनी केलेल्या छोटेखानी पण आक्रमक खेळीमुळे भारताला २० षटकात २ बाद २२४ धावांचा टप्पा पार करता आला.

इंग्लंडचा पराभव

भारताने इंग्लंडला २२५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला २० षटकात ८ बाद १८८ धावाच करता आल्या. इंग्लंडकडून जोस बटलर(५२) आणि डेव्हिड मलानने(६८) अर्धशतके केली. मात्र, अन्य फलंदाजांना फार काही करता आले नाही. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच भुवनेश्वर कुमारने २ विकेट्स घेतल्या. हार्दिक पंड्या आणि टी नटराजनने प्रत्येकी १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

‘कॅप्टन’ कोहलीचा मोठेपणा! मालिका विजयानंतर ट्रॉफी सोपवली सुर्यकुमार आणि इशान किशनकडे, पाहा व्हिडिओ

टी२०मध्ये ‘कर्णधार’ कोहलीचीच हवा! विलियम्सन, फिंच, मॉर्गन सर्वांनाच वरचढ ठरत गाठला अव्वल क्रमांक

वनडेपाठोपाठ टी२० मालिकेत टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात; दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या सामन्यात मोठा विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---