भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवार (२५ नोव्हेंबर) पासून कानपूरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात एक विचित्र योगायोग घडला आहे, जे खूप कमी लोकांच्या लक्षात आले असेल. या सामन्यात एकाच शहरातील फलंदाज आणि गोलंदाज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एकाच शहरातील फलंदाज आणि गोलंदाज आमनेसामने येतात, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळते.
कानपुर कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेलही खेळत आहे. त्याचबरोबर भारतीय संघात मुंबईत जन्मलेल्या श्रेयस अय्यरचाही समावेश आहे. अय्यर या सामन्यातून कसोटी पदार्पण करत आहे. अशा परिस्थितीत हा कसोटी सामना त्याच्यासाठी खूप खास आहे. न्यूझीलंड संघाचा गोलंदाज एजाज पटेल आणि भारतीय संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर या दोघांचा जन्म मुंबईत झाला आहे. त्यामुळे एकाच शहरातील हे फलंदाज आणि गोलंदाज कानपुर कसोटीत मात्र प्रतिस्पर्धी बनून आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले.
विशेष म्हणजे, कानपूर कसोटीनंतर मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी मुंबईत खेळवली जाणार आहे.
कोण आहे एजाज पटेल?
डावखुरा फिरकीपटू एजाज पटेलचा जन्म २१ ऑक्टोबर १९८८ रोजी मुंबईत झाला. एजाज ८ वर्षांचा होता तेव्हा त्याचे कुटुंब न्यूझीलंडला गेले. भारतात आल्यानंतर इजाज म्हणाला की, ‘मी भारतातील अशा ठिकाणी आहे, जिथे मी यापूर्वी कधीही आलो नाही. भारत हा एक अद्भुत देश आहे, पण सध्याची परिस्थिती पाहता आपण इथे फिरू शकत नाही, काही पाहू शकत नाही. हा एक असा देश आहे जिथे गर्दीतही शांतता आहे. हेच या देशाला खास बनवते.’
क्रिकेटविषयी बोलताना ३३ वर्षीय इजाज पुढे म्हणाला की, ‘भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंना काय करावे लागते हे आम्हाला माहीत आहे. परंतु आम्हाला हे देखील माहित आहे की या खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांना तोंड देणे हे फिरकीपटूंसाठी आव्हान असते. मात्र, मी आव्हानाची वाट पाहत आहे. भारतात वापरला जाणारा एसजी चेंडू ड्यूकसारखाच कडक असतो, पण पकडीत तो उत्कृष्ट बसतो.’ कानपूर कसोटीपूर्वी एजाजने ९ कसोटी सामने खेळले आहेत, त्यात त्याने २६ विकेट घेतल्या आहेत.
श्रेयस अय्यरविषयी थोडसं
श्रेयस अय्यरचा जन्मही ६ डिसेंबर १९९४ रोजी मुंबईत झाला होता. अय्यरने नोव्हेंबर २०१७ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले होते. त्याने दिल्लीतच न्यूझीलंडविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळला होता. त्यानंतर त्याने तब्बल ४ वर्षांनी न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीत पदार्पण केले. अय्यरने आतापर्यंत भारतीय संघासाठी २२ एकदिवसीय आणि ३१ टी-२० सामने खेळले आहेत. अय्यरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८१३ आणि टी-२० मध्ये ५८० धावा केल्या आहेत. त्याने वनडेतही शतक झळकावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अय्यरला कसोटी पदार्पणाची संधी मिळल्याने माजी निवडकर्ता खुश; म्हणाले, ‘अनेकांनी माहीत नसेल की…’
‘हे’ ५ क्रिकेटर ठरू शकतात चेतेश्वर पुजारासाठी धोक्याची घंटा, घेऊ शकतात कसोटी संघातील जागा