भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी-२० मालिकेनंतर गुरुवारी (२५ नोव्हेंबर) दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू झाली आहे. कसोटी मालिकेत भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. युवा भारतीय खेळाडू श्रेयस अय्यरने या पहिल्या कसोटी सामन्यातून त्याचे कसोटी पदार्पण करणार आहे. श्रेयस अय्यरला मिळालेल्या या संधीविषयी भारतीय संघाचे माजी निवडकर्ता जतिन परांजपे यांनी सामन्याच्या आदल्या दिवशी त्यांचे मत मांडले होते. त्यांच्या मते श्रेयस कसोटी क्रिकेटमधील एक आक्रमक फलंदाज आहे.
जतिन परांजपे पत्रकरांशी बोलताना म्हटले की, “आपण त्याला मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळताना पाहिले आहे. त्यामुळे मला वाटते की, जास्त लोकांना माहीत नसेल की, तो प्रत्यक्षात एक चांगला कसोटी खेळाडू देखील आहे. तो आधुनिक आणि आक्रमक खेळाडू आहे. मला वाटते की, मायदेशात पदार्पण करण्याची संधी मिळणे कोणत्याही खेळाडूसाठी चांगले असते आणि श्रेयससाठी देखील तसेच असेल.”
तत्पूर्वी पहिल्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने याबाबत माहिती दिली होती की, श्रेयस अय्यर कानपूरध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. याबाबत बोलताना परांजपे पुढे म्हणाले की, “जर भारत ३ फिरकी गोलंदाजांसोबत सामन्यात उतरला, तर माझ्या मते भारतासाठी फायदेशीर असेल आणि श्रेयस अय्यरसाठी अधिकच चांगले असेल. कारण तो अशाच प्रकारच्या खेळपट्टीवर खेळून पुढे आला आहे. मी फक्त आशा करतो की फक्त एकदा त्याला खेळण्याची संधी मिळाली. तर मला पक्का विश्वास आहे की, श्रेयस चांगली खेळी करेल.”
परांजपेच्या मते ही एक मोठी संधी आहे, यात कसलीच शंका नाहीय. यात थोडा नशिबाचा देखील भाग आहे, पण श्रेयसला या संधीचा फायदा घ्यावा लागेल. परांजपे यांच्या वक्तव्यानुसार, श्रेयसनेही पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी उल्लेखनीय कामगिरी केली. तो दिवसाखेर १३६ चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ७५ धावांवर नाबाद परतला.
दरम्यान, श्रेयसने यापूर्वी २०१७ मध्ये श्रीलंकाविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच त्याने २०१७ च्या नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी-२० पदार्पण केले होते. त्यानंतर त्याला आता न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हे’ ५ क्रिकेटर ठरू शकतात चेतेश्वर पुजारासाठी धोक्याची घंटा, घेऊ शकतात कसोटी संघातील जागा
दुर्दैवी! मैदानावर क्रिकेट खेळताना दुखापती झाल्याने निधन झालेले ३ खेळाडू
आयपीएल २०२२ पूर्वी केकेआरने घेतला मोठा निर्णय, मॉर्गनला मिळणार संघातून डच्चू?