भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिका निर्णायक सामना रविवारी (१८ जानेवारी) खेळला गेला. इंदौरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारत ४१ धावांनी पराभूत झाला. यामुळे भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका १-२ने गमावली. यजमानांच्या या पराभवाचे खापर कर्णधार आणि इतर खेळाडूंवर फोडले जात आहे. यामध्ये केवळ खेळाडूंचीच चूक नसून प्रशिक्षकही त्याला तेवढेच जबाबदार आहेत. जुलै २०२४पासून भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदाची धुरा भारताच माजी विश्वविजेता गौतम गंभीरने सांभाळली आहे, तेव्हापासून भारताने अनेक नकोसे विक्रम केले आहेत. त्यातीलच काही विक्रमे पाहुया.
रविवारी झालेला वनडे सामना आणि न्यूझीलंडच्या मालिका विजयाने अनेक विक्रमे रचली. त्यातील एक आणि महत्वाचा असा की वनडे क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंडची भारतात वनडे मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी त्यांनी २०२४मध्ये भारतात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याचाही पराक्रम केला आहे. ह्या दोन्ही गोष्टी गंभीर भारताचा मुख्य प्रशिक्षक असताना घडल्या.
गौतम गंभीर भारताचा मुख्य प्रशिक्षक असताना संघाने केलेले निराशाजनक रेकॉर्ड्स-
२७ वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावली
पहिल्यांदाच तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ३० विकेट्स गमावल्या
१९८८नंतर पहिल्यांदाच न्युझीलंडकडून घरच्या मैदानावर कसोटी गमावली
१९ वर्षानंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर कसोटी सामना हरला (भारत वि. न्यूझीलंड)
२०१२ नंतर पहिल्यांदा कसोटी मालिका गमावली (नोव्हेंबर २०२४)
१२ वर्षानंतर लागोपाठ दोन कसोटी सामने गमावले (भारत वि. न्यूझीलंड)
१२ वर्षानंतर वानखेडेवर कसोटी सामना गमावला (भारत वि. न्यूझीलंड)
४७ वर्षानंतर घरच्या मैदानावर लागोपाठ तीन कसोटी सामन्यांत भारत पराभूत
पहिल्यांदाच कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यांत भारत पोहचला नाही
२०१५ नंतर पहिल्यांदाच बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावली
५ शतके करूनसुद्धा कसोटी सामना गमावणारा भारत पहिलाच संघ (लीड्स कसोटी)
११ वर्षानंतर ६०० पेक्षा अधिक धावा दिल्या (मॅनचेस्टर)
१७ वर्षानंतर ऍडलेड वनडे सामना गमावला
१५ वर्षानंतर घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत पराभूत
८ वर्षानंतर कोलकातामध्ये सामना गमावला (लागोपाठ ९ विजयानंतर)
२५ वर्षानंतर घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावली (२-०)
गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताने २०२४चा टी२० विश्वचषक आणि २०२५ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंंकली आहे. मात्र घरच्या मैदानावर भारताचे वर्चस्व कमी होताना दिसत आहे.






