भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना जिंकत भारतीय संघाने आपली प्रतिष्ठा राखली. ऑस्ट्रेलियाला १३ धावांनी पराभूत करत वनडे मालिका २-१ अशा फरकाने समाप्त केली. मागील दोन सामन्यात निराशाजनक कामगिरी केलेल्या भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात अफलातून कामगिरी करताना, ऑस्ट्रेलियाचे फलंदाज नियमित अंतराने बाद करत सामना जिंकून दिला. या विजयासोबतच, भारताने असा एक विक्रम केला, जो यापूर्वी कोणत्याही पाहुण्या संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला नव्हता.
भारतीय संघाचा मालिकेतील पहिला विजय
ऑस्ट्रेलियाची राजधानी असलेल्या कॅनबेरा येथे वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला गेला. भारतीय संघाने कर्णधार विराट कोहली आणि दोन अष्टपैलू हार्दिक पंड्या व रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ३०२ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार ऍरॉन फिंच व अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतके झळकावत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या नियंत्रित माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजांची डाळ शिजली नाही आणि अखेर त्यांना १३ धावांनी पराभव पत्करावा लागला.
कॅनबेरामध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिला पराभव
तिसरा सामना खेळल्या गेलेल्या कॅनबेरा येथील मनुका ओव्हल या मैदानावर ऑस्ट्रेलियन संघ आपला पाचवा वनडे सामना खेळत होता. यापूर्वी, ऑस्ट्रेलियन संघाने या मैदानावर चार वनडे सामने खेळले होते. या चारही सामन्यात ऑस्ट्रेलियाने विरोधी संघांना धुळ चारली होती. २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी ३९ धावांनी विजय साजरा केलेला, तर २०१४ मध्ये दक्षिण आफ्रिकेला ७४ धावांनी लोळवले होते.
भारतीय संघ २०१५-२०१६ च्या दौऱ्यात या मैदानावर एक वनडे सामना खेळला होता. या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून २५ धावांनी पराभव पत्करावा लागलेला. मनुका ओव्हलवर अखेरचा वनडे २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंड यांच्या दरम्यान खेळला गेलेला. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ११६ धावांनी पराभूत केले होते.
भारतीय संघाने रोखला ऑस्ट्रेलियाचा विजयरथ
आज भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा १३ धावांनी पराभव करत मनुका ओव्हलवरील ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला. २०१३ पासून या मैदानावर वनडे सामने खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा हा मनुका ओव्हलवरील पहिलाच पराभव आहे.
टी२० आणि कसोटीतही अजिंक्य आहे ऑस्ट्रेलिया
या मैदानावर ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी एक टी२० व कसोटी सामना खेळला आहे. या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. भारताविरुद्ध ४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना मनुका ओव्हलवरच खेळवला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पंड्या-जडेजा जोडीची कमाल! ऑस्ट्रेलियाविरुद्ध दीडशतकी भागीदारी करत मोडला १० वर्षापूर्वीचा रेकॉर्ड
Video: आयपीएल २०२० मध्ये एकही सामना खेळायला न मिळालेल्या फलंदाजाची कमाल; ५५ चेंडूत ठोकले दीडशतक
ट्रेंडिंग लेख-
लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू
लईच धुतलं! ‘या’ तीन भारतीय फलंदाजांकडून टी२० मध्ये कांगारू गोलंदाजांची सर्वाधिक स्ट्राईक रेटने धुलाई






