बुधवारी (5 फेब्रुवारी) हेमिल्टन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिला वनडे (ODI) सामना पार पडला. 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत केले. त्याचबरोबर या मालिकेत न्यूझीलंडने 1-0ने आघाडी घेतली.
या सामन्यात भारतीय संघावर षटकांची गती कमी राखल्याने आयसीसीकडून दंड आकारण्यात आला आहे. सेडन पार्कमध्ये(Sedon Park) खेळलेल्या या सामन्यात भारतीय संघाला निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्याबद्दल सामना शुल्काच्या 80 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
आयसीसी आचार संहितेच्या कलम 2.22 नुसार सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड (Chris Broad) यांना भारतीय संघ दोषी आढळला. त्यामुळे भारतीय संघावर सामना शुल्काच्या 80 टक्के रकमेचा दंड ठोठावला.
झाले असे की, भारतीय संघाने निर्धारित वेळेत 4 षटके कमी टाकल्यामुळे संघावर प्रत्येकी 1 षटकासाठी 20 टक्के दंड या हिशोबाने 80 टक्के दंड ठोठावण्यात आला.
यावेळी सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपली चूक कबूल करत आयसीसीने दिलेली शिक्षा मान्य केली आहे.
या सामन्यात मैदानावर उपस्थित पंच लॅंग्टन रुसेरे (Langton Rusere), शॉन हेग (Shaun Haig), तिसरे पंच (थर्ड अंपायर) ब्रुस ऑक्सनफोर्ड (Bruce Oxenford) आणि चौथे पंच (फोर्थ अंपायर) ख्रिस ब्राऊन(Chris Brown) यांनी भारतीय संघावर षटकांची गती कमी राखल्याचा आरोप केला होता, असे आयसीसीने आपल्या अहवालात म्हटले आहे.
https://twitter.com/Maha_Sports/status/1225063611149643776
https://twitter.com/Maha_Sports/status/1225052083998482432