सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव २ बाद ३१२ धावांवर घोषित केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावातील ९४ धावांच्या आघाडीसह भारताला ४०७ धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवसाखेर २ बाद ९८ धावा केल्या आहेत.
भारत सध्या या सामन्यात ज्या परिस्थितीत आहे, त्यावरुन अनेकांच्या मते हा सामना भारतीय संघाला जिंकणे अवघड आहे. पण याआधी ४४ वर्षांपूर्वी भारतीय संघाने असा पराक्रम करुन दाखवला आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा धावांचा यशस्वी पाठलाग –
सन १९७६ मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये ७ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात भारताने ४०३ धावांचं आव्हान लिलया पार केले होते. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी केली होती. यावेळी त्यांनी पहिल्या डावात ३५९ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने पहिल्या डावात २२८ धावाच केल्या. त्यामुळे भारताला १३१ धावांनी पिछाडी स्विकारावी लागली. त्यानंतर वेस्ट इंडिजने दुसरा डाव २७१ धावांवर घोषित केला. त्यामुळे भारतासमोर ४०३ धावांचे आव्हान होते.
त्यावेळी भारताकडून दुसऱ्या डावात ४०३ धावांचा पाठलाग करताना सुनील गावसकर आणि गुंडप्पा विश्वनाथ या दोघांनी शतके झळकावली. गावसकरांनी १०२ आणि विश्वनाथ यांनी ११२ धावांची खेळी केली. त्याचबरोबर मोहिंदर अमरनाथ यांनी ८५ धावा केल्या. त्यामुळे भारताने ४ विकेट्स गमावत शेवटच्या दिवशी ४०६ धावा करत सामना जिंकण्याचा पराक्रम केला होता.
सिडनी कसोटीत भारतासमोर पाचव्या दिवशी ३०९ आव्हान –
भारताने ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाखेर २ बाद ९८ धावा केल्या असल्याने अजून ३०९ धावा भारताला आवश्यक आहेत. भारताकडून सलामीवीर रोहित शर्माने ५२ आणि शुबमन गिलने ३१ धावा केल्या. पण हे दोघेही बाद झाले आहेत. त्यामुळे आता भारताच्या पुढच्या धावा करण्याचे आव्हान भारताच्या अन्य ७ जणांवर असणार आहे. कारण रविंद्र जडेजाचा डाव्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाले असल्याने तो फलंदाजी करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता भारताच्या उरलेल्या ७ खेळाडूंनाच पाचव्या दिवशी ३०९ धावांचे आव्हान पेलावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
“सिडनीच्या मैदानावर शेरेबाजीच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत”
पंतची दुखापत पडली पथ्यावर, साहाने एकाच डावात ४ ऑसींना तंबूत धाडत केला ‘नवा रेकॉर्ड’