भारत आणि आयर्लंड (India vs Ireland) यांच्यात नुकतीच 2 सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली, ज्यात भारताला 0-2 असा पराभव पत्करावा लागला. या लाजिरवाण्या पराभवानंतर चहूबाजूंनी भारतीय संघावर टीका होत आहे. आता भारताचा माजी फलंदाज मनोज तिवारी (Manoj Tiwari on Gautam Gambhir) याने हेड कोच गौतम गंभीरवर कडाडून टीका केली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला चांगलेच सुनावले आहे.
भारतीय संघाबद्दल बोलताना मनोज तिवारी म्हणाला, कदाचित भारत दक्षिण आफ्रिकेत विश्वचषक जिंकेलही, पण आयर्लंडविरुद्ध गमावलेल्या या टी-20 मालिकेचे काय? या पराभवासाठी जबाबदार कोण? मी तुम्हाला या गंभीर मुद्द्याकडे लक्ष द्यायला सांगितले होते, पण कोणीही माझ्या म्हणण्याकडे गांभीर्याने पाहिले नाही.
गंभीरवर निशाणा साधताना तो पुढे म्हणाला, मला माहित आहे की, पीआर एजन्सी आणि तथाकथित निर्णय घेणाऱ्यांचे मित्र श्रेयस अय्यरवर दोष ढकलायला सुरुवात करतील. पण हा फक्त श्रेयस अय्यरचा दोष नाही, तर इतर फलंदाजांचाही आहे जे चांगली कामगिरी करू शकले नाहीत.
मनोज तिवारीने स्पष्ट केले की, या मालिकेतील पराभवाचे खापर केवळ श्रेयस अय्यरवर फोडले जाईल. खरी चूक खेळाडूंची नसून ड्रेसिंग रूममधील त्या मोठ्या समस्येची आहे, ज्याकडे सहसा दुर्लक्ष केले जाते. आता वेळ आली आहे की आपण या समस्येचे निराकरण केले पाहिजे. तिवारीच्या मते, आयर्लंडविरुद्धच्या या दारूण पराभवाची जबाबदारी गौतम गंभीरनेही घेतली पाहिजे. या मालिकेत झालेल्या खराब कामगिरीसाठी फक्त श्रेयस अय्यर एकटा जबाबदार नाही. उल्लेखनीय म्हणजे, आयर्लंडने पहिल्या सामन्यात भारताला 183 धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र टीम इंडियाला केवळ 148 धावा करता आल्या. तर दुसऱ्या सामन्यात आयर्लंडने 154 धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात भारतीय टीमला फक्त 153 धावांपर्यंत मजल मारता आली आणि भारताला पराभवाचा सामना करावा लागला.






